नाशिक : लोकसंख्या वाढली तशी विकृतीही वाढली आहे. परंतु, महिला आयोगात पदांच्या संख्येत वाढ झालेली नाही, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी चाकणकर येथे जनसुनावणीसाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य महिला आयोगाच्या कार्यशैलीची त्यांनी माहिती दिली. सर्वात कठोर कायदे हे महाराष्ट्रात असले तरी त्यांचे पालन होत नाही. अनेक ठिकाणी जन्मदाखल्यात बदल करून बालविवाह केले जातात. हे सर्व कायदे सर्वांच्या संरक्षणासाठी आहेत. कायदा मोडण्याकडे आपला कल जास्त असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. कायद्याच्या माध्यमातून आरोपीला शिक्षा देण्याचे काम आयोगाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही कुटुंबातील तक्रार आली तर समूपदेशाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असतो . कुटुंबात संवाद घडवून आणणे, हे आमचे काम आहे.तक्रारदार सगळीकडे असतात. तक्रार करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. नाशिकमधील काही घटनांची माहिती घेतली आहे. अधिकाऱ्यांबरोबर बसून न्यायनिवाडा करू. पीडितेला न्याय मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे.
आयोगाने कामकाजाची पध्दत बदलावी, अशी तक्रार आहे. प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत काम करण्याची प्रणाली वेगळी आहे. माझ्या माहितीप्रमाणे याआधीही जेवढ्या महिला आयोगावर होत्या, त्या राजकीय पक्षाशी संबंधितच होत्या. विरोधक पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाही राजीनामा मागतात. राजीनामा देण्याची गरज आपणास वाटत नाही, असे चाकणकर यांनी नमूद केले.