शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी विद्यार्थ्यांचे योगदान

ज्या कारणास्तव पतीला आत्महत्या करावी लागली, त्या शेतीतून आजही काहीच उत्पन्न मिळत नाही. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन काही तरी वेगळे करावे, अशीच पतीची इच्छा होती. त्यामुळे किमान मुलांकरिता, त्यांच्या शिक्षणाद्वारे पतीचे स्वप्न साकार करण्यासाठी आपणास जगायचे आहे. या बिकट स्थितीत नाशिकच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमच्या दु:खाची जाणीव झाली आणि त्यांनी मदत केली, याबद्दल आपण ऋणी आहोत..

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कविता पाटील यांनी अशा शब्दांत आपली भावना मांडली आणि उपस्थित विद्यार्थी, प्राचार्य व प्राध्यापकांचे डोळे पाणावले. हं. प्रा. ठा. आणि रा. य. क्ष. महाविद्यालयांत सोमवारी ‘स्पंदन’ सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने संकलित झालेला २१ हजार रुपयांचा मदतनिधी पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आला. आजच्या तरुणाईबद्दल परस्परविरोधी अन् टोकाची मतमतांतरे व्यक्त केली जातात; परंतु समाजातील प्रश्नांबाबतची जाणीव आणि बांधीलकी शेवटच्या घटकाचे दु:ख जाणून तेही चांगले काम करू शकतात, याचा दाखला यानिमित्ताने मिळाल्याची प्रतिक्रिया प्राचार्य व प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आली.

राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, हा सर्वाच्या चिंतेचा विषय. प्रसारमाध्यमे त्यावर सातत्याने प्रकाशझोत टाकतात. असे प्रकार घडू नयेत म्हणून विविध घटकांकडून मानवी संवेदनांना साद घालण्याचा प्रयत्न होत आहे. विविध सामाजिक संस्थांनी या कामी पुढाकार घेतला असताना तरुणाई त्यात मागे नाही, हे या विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. महाविद्यालयाच्या ‘स्पंदन’ सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश नखाते, महिला प्रतिनिधी भक्ती आठवले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपणास शक्य होईल तितकी मदत देण्याचा प्रयत्न केला. यामुळे या एकाच कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वाच्या सहकार्याने २१ हजार रुपये संकलित झाले. सोमवारी ही रक्कम विद्यार्थ्यांनी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य खंडेलवाल, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. विजयकुमार पाठारे आदींच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील कविता पाटील यांना दिली.

गारपिटीत उद्ध्वस्त झालेले शेत पाहून दीड वर्षांपूर्वी सतीश पाटील यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार. पतीच्या निधनानंतर अडचणींचा डोंगर पार करतानाचे काही अनुभव कविता पाटील यांनी कथन केले. शेतीवर कोसळणाऱ्या संकटामुळे पतीला आत्महत्या करावी लागली होती. आजही त्या चार बिघा जमिनीतून काहीच उत्पन्न मिळत नाही. यामुळे शिवणकाम व मजुरी करून चरितार्थ चालवावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मदतीने त्या भारावल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या वेदना जाणत केलेल्या मदतीमुळे मुलांचे शिक्षण, दिवाळीचे चार दिवस त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद देता येईल, असे त्यांनी नमूद केले. प्राचार्य सूर्यवंशी यांनी मदत मोठी नसली तरी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पीडितांची वेदना जाणल्याचे सांगितले. निधीचा विनियोग लघू उद्योग वा तत्सम काही व्यवसायासाठी करता येईल काय याचा विचार करावा, असे खंडेलवाल व प्रा. भार्गवे यांनी सुचविले. या वेळी सुरेश नखाते, भक्ती आठवले, कोमल भागवत, ऐश्वर्या गुजराथी आदी विद्यार्थी उपस्थित होते.