नाशिक – आपण स्वतः खेळाडू असल्यामुळे नक्कीच खेळाडूंच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे मत नाशिक जिल्ह्यातील नव्यानेच झालेले क्रीडामंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी मांडले आहे. महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये किती खेळांचा समावेश आहे, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या स्पर्धांमध्ये ९४ खेळांचा समावेश आहे. परंतु, त्यापैकी ठराविक ३०-३५ क्रीडा प्रकारानांच शासनाच्या सुविधा मिळतात. क्रीडा मंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी नाशिक जिल्हा विविध क्रीडा संघटना आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक यांच्या वतीने करण्यात आली असता कोकाटे यांनी त्यांना थोडा वेळ देण्यास सांगितले.
विधिमंडळातील रमी चित्रफीत प्रकरणावरुन वादात सापडल्यानंतर ॲड. माणिक कोकाटे यांच्याकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री केले आहे. आपल्या जिल्ह्यास क्रीडामंत्रीपद मिळाल्याने त्यांचा जिल्ह्यातील खेळाडूंना लाभ होऊ शकेल, अशी भावना नाशिक जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची झाली आहे.
कोकाटे यांना खेळाडूंना आवश्यक क्रीडा सुविधांसदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देताना चंद्रकांत बनकर, अशोक कदम, गौरव गाजरे, आनंद खरे, दीपक निकम, मुकेश गोंदकर, पृथ्वीराज गोंदकर, कुणाल अहिरे, आनंद चकोर आदी उपस्थित होते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वच खेळाडूंना सारखीच मेहनत करावी लागते. परंतु, त्यापैकी काही खेळाडूंनाच पदके मिळतात. त्यांचाच विचार केला जातो. सर्वच खेळाडू सारखीच मेहनत करतात तर अशा खेळाडूंनाही शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ९४ खेळांचा समावेश असला तरी त्यापैकी ठराविक ३०-३५ खेळांनाच शासनाच्या सुविधा मिळतात. १० वी आणि १२ वी इयत्तेत असलेल्या खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग आणि प्राविण्य मिळविल्यास २५ गुण दिले जातात. विना अनुदानित खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मात्र हे गुण दिले जात नाहीत, याकडे निवेदनातून क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. शिवाय या विनाअनुदानित खेळांच्या स्पर्धा आयोजनाचा आणि इतर खर्च शासन करत नाही. त्या, त्या खेळांच्या क्रीडा संघटना स्वतः खर्चाचा भार उचलतात.
त्यामुळे किमान या खेळाडूंना २५ गुण मिळावेत. तसेच या खेळाडूंनाही नोकरीमध्ये पाच टक्केआरक्षण मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू पदक मिळविण्यात अग्रेसर आहेत. ९० टक्के राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असतात.
हरियाणा, पंजाब आणि इतर काही राज्यांनी त्यांच्या खेळाडूंसाठी नोकरी आणि इतर सुविधांमध्ये मोठी तरतूद केलीली दिसून येते. परंतु, त्याच गुणवत्तेचे खेळाडू महाराष्ट्रातही असताना त्यांना या सुविधा कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना या सर्व सुविधा मिळाव्यात, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
निवेदन स्वीकारताना क्रीडा मंत्री माणिक कोकाटे यांनी, आपण स्वतः खेळाडू असल्यामुळे नक्कीच खेळाडूंच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, त्यासाठी थोडा वेळ द्यावा.आपण सर्व बाबींचा विचार करून खेळाडूंच्या न्याय्य आणि आवश्यक मागण्या पूर्ण करणार, असे कोकाटे यांनी नमूद केले.