नाशिक – अडीच वर्षात मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. गतवेळी या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर, २२ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीत कारखान्याकडून सुरक्षासंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कारखान्याविरुद्ध येथील न्यायालयात खटला दाखल आहे. पुन्हा आगीचा तसाच प्रकार घडल्याने सुरक्षा नियमावलीच्या पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एक जानेवारी २०२३ रोजी जिंदाल पॉलिफिल्म्स कारखान्यात आग लागली होती. बॅच पॉली विभागात स्फोट होऊन ही आग लागली होती. ती सर्वत्र पसरली. अग्निशमन दलांनी अथक प्रयत्न करून तीन ते चार दिवसांत ती पूर्णपणे विझवली. या दुर्घटनेत सुमारे २५ कामगार जखमी झाले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
उपरोक्त दुर्घटनेत अनेक कामगारांचा संपर्क होऊ शकल्याने कुटुंबियांना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसील कार्यालयात संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालक अंजली आडे यांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत करण्यात आली.
या चौकशीत जिंदालकडून सुरक्षेसंबंधी विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी जिंदाल पॉलीफिल्म्स विरोधात येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे सुमारे २५० एकरात जिंदाल पॉलीफिल्म्स कंपनीचा पसारा आहे.
सुमारे ५०० कामगार या ठिकाणी काम करतात. कारखान्याला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. २०१३ मध्येही कारखान्यास आग लागली होती. पुन्हा या कारखान्यात आग लागल्याने कारखान्याने मागील दुर्घटनेतून काही धडा घेतला की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे यंत्रणेकडून सांगितले जाते. दोन कामगार जखमी झाले आहेत.