लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिल्ह्यातील गिरणा, हतनूर व वाघूर या मोठय़ा प्रकल्पांतील साठा दिवसेंदिवस कमी होत असून, दुसऱ्या बिगरसिंचन आवर्तनामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा प्रकल्पातील साठा ३१ टक्क्यांवर आला आहे. हा साठा नऊ  टक्क्यांनी घटला असून, एप्रिलमध्ये साठा २२-२३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील ३१ गावांसाठी ३५ टँकर सुरू आहेत.

जिल्ह्यातील तीन मोठय़ा व १३ मध्यम प्रकल्पांतील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जानेवारीत गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. फेब्रुवारीत दुसरे आवर्तन सोडण्यापूर्वी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. आता हा साठा ३१ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी हतनूर व वाघूर या प्रकल्पांतील जलसाठा अनुक्रमे ६६.६७ आणि ७७.९१ टक्के होता. यंदा हतनूर व वाघूर या प्रकल्पांतील जलसाठा अनुक्रमे ६७ आणि ७६ टक्क्यांवर आहे. तिन्ही मोठय़ा प्रकल्पांत गतवर्षी ५३.५९ टक्के, तर यंदा तीन टक्क्यांनी कमी अर्थात ४९ टक्के आहे. जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांत गतवर्षी ५०.७७ टक्के व यंदा अवघा ३९ टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा >>>धुळ्यात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न

एकीकडे गिरणा प्रकल्पातून चाळीसगाव, पाचोरा, मालेगाव येथील एमआयडीसींना पाणी पुरवावे लागणार असून, दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीही सुमारे दोनशे गावांसाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाला आतापासूनच पाण्याबाबत नियोजन करावे लागणार आहे. भोकरबारी मध्यम प्रकल्पांतील जलसाठा अवघ्या सहा टक्क्यांवर, तर अंजनी प्रकल्पातील जलसाठाही १५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे एरंडोलकरांसमोर टंचाईचे सावट आहे. मार्चनंतर एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, चाळीसगाव, बोदवड या शहरांना टंचाईचे संकट जाणवू शकेल.

जिल्ह्यतील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर व पारोळा यांसह इतर तालुक्यांतील ३१ गावांच्या घशाला कोरड पडल्याने ३५ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. प्रत्येक गावात मागणीनुसार पाच ते सहा फेऱ्या टँकरच्या होत आहेत. तसेच जिल्ह्यातील ४३ गावांसाठी ४८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील टँकर सुरू असलेली गावे

चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रूक, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा; भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी; अमळनेर तालुक्यातील तळवाडे, शिरसाळे बुद्रूक, निसडी, लोणपंचम, नगाव बुद्रूक; पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.