नाशिक – घराच्या छतावर मुसळधार पावसामुळे साचलेले पाणी इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथे एका युवकाच्या मृत्युस कारण ठरले. छतावरील पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करतांना चुलत भावाच्या पत्र्यावर पडल्याने लाकडी काठ्या घेऊन हाणामारी झाली. या घटनेत २५ वर्षाच्या दिनेश भटाटे या युवकाची हत्या झाली. या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील संशयित ज्ञानेश्वर भटाटे याच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने प्रवीण भटाटे (२९) आणि त्याच्या कुटूंबियांविरुध्द भांडण करून कुरापत काढली. शिवीगाळ केली. राजेंद्र भटाटे, दीपक भटाटे, नितीन भटाटे, महेश भटाटे यांनी तक्रारदाराचा भाऊ दामु उर्फ दिनेश भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून खाली पाडत मारहाण केली. ज्ञानेश्वर भटाटेने त्याच्याजवळील असलेला चाकु त्याचा मुलगा रमेश भटाटे याच्याकडे दिला. रमेशने दिनेशच्या छातीत चाकु खुपसला. तक्रारदार प्रतिकार करीत असताना नितीन भटाटेने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीवरुन इगतपुरी पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर भटाटे, रमेश भटाटे, नितीन भटाटे, दीपक भटाटे, राजेंद्र भटाटे, महेश भटाटे (सर्व रा. टिटोली, इगतपुरी, नाशिक) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत संशयितांचा शोध घेतला जात आहे. संशयितांना अटक करावी, या मागणीसाठी मयताच्या कुटूंबियासह टिटोली ग्रामस्थांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे.