आचारसंहिता संपल्यानंतरही उद्घाटनास विलंब

नवी मुंबई लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून महिना झाला तरी नवी मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होऊनही ते लोकार्पण न केल्याने नागरिकांच्या उपयोगात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यात सेंट्रल पार्क, संवेदना उद्यान, वाशी आग्निशमन इमारत यासह अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

नवी मुंबई महापालिकेने नागरी सुविधांना प्राधान्य देत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प केले आहेत. मनोरंजनासाठी विविध उद्याने विकसित करण्यात आली आहेत, तर ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचीही निर्मिती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विविध कामांचा शुभारंभाचा धडका लावला होता. यावेळी राजकीय श्रेयावरून वादही झाले होते. परंतु  सध्या शहरात अनेक देखण्या वास्तू पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र त्या उद्घाटनाविना पडून आहेत.

शहराचे आकर्षण ठरणारे घणसोली येथील ‘सेन्ट्रल पार्क’ तयार असूनही लोकार्पण करण्यात आले नाही. त्यामुळे सुट्टीत बच्चेकंपनीसह नागरिकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागले. सानपाडा सेक्टर १० येथील विशेष मुलांचा संवेदना उद्यान हा राज्यातील एकमेव प्रकल्पही तयार आहे. येथीलच अण्णा भाऊ  साठे समाजमंदिर वापराविना पडून आहे. याच इमारतीत तुर्भे विभाग कार्यालयाचे काम मात्र सुरू करण्यात आले आहे.

उत्तुंग इमारतींच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाशी अग्निशमन केंद्राचे लोकापर्णही अद्याप लालफितीत अडकले आहे. त्यामुळे वाशी अग्निशमन विभागाला पावसाळ्यातही शेडमध्ये व कंटेनरमध्ये काम करावे लागत आहे.

ज्या ऐरोलीतील समाजमंदिराच्या उद्घाटनावरून राजकीय वादंग झाला. त्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा न झाल्यामुळे या वास्तूचे काम पूर्ण असतानाही उपयोगात येत नाही. सानपाडय़ातील सीताराम मास्तर उद्यानात डेकोरेटिव्ह लाइट लावण्यात आल्या आहेत. त्याचे काम पूर्ण झाले असतानाही उद्घाटन करण्यात येत नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून पूर्णत्वास गेलेले अनेक प्रकल्प वापराविना पडून आहेत.

शहरातील काम पूर्ण झालेल्या वास्तू वापरात आणण्यासाठी या वास्तूंचे लोकार्पण लवकरात लवकर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

  -डॉ.रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका