बावखळेश्वर मंदिरावर कारवाई; पोलिसांचे अर्धे मनुष्यबळ तैनात

नवी मुंबई बावखळेश्वर मंदिरावर अतिक्रमणविरोधी पथकाने दिवसभर गुप्तता पाळत कारवाई केली. नेमकी किती कारवाई केली हे गुलदस्त्यात ठेवले. मात्र या कारवाईमुळे पूर्ण एमआयडीसीला संचारबंदीचे स्वरूप आले आहे. पोलीस आयुक्तालयातील जवळपास अर्धे मनुष्यबळ याच बंदोबस्तात तैनात करण्यात आल्यानेच जास्त तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.

पावणे एमआयडीसीबरोबर शहरातही ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एमआयडीसीमध्ये बांधण्यात आलेल्या बावखळेश्वर मंदिरावर मंगळवारी सकाळपासून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यापूर्वी येथील मूर्ती हलवण्यात आल्याचे एमआयडीसीच्या सूत्रांनी माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून एमआयडीसी प्रशासन आणि पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. मंदिराला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले असून कुणालाही या रस्त्यावर सोडले जात नाही. या परिसरातील ज्या कंपनीत काम करणारे आहेत त्यांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय सोडले जात नाही. मात्र आज (मंगळवार) ठाणे-बेलापूर रस्त्यावरून एमआयडीसीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या प्रवेशाला चौकीचे स्वरूप आले होते.

या शिवाय अंतर्गत रस्त्यांवरही मोठय़ा  प्रमाणात पोलीस दिसत असल्याने सर्व रस्त्यांना छावणीचे स्वरूप आले होते.

शहरातही पोलीस छावणी

पोलिसांनी केवळ एमआयडीसीच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि मंदिर बचाव समितीचे पदाधिकारी कुठे कुठे निदर्शने करू शकतात अशा शहरातील सर्व ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली होती. या शिवाय राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

रोजगार बुडाला

एमआयडीसीत काम करणाऱ्या नोकरदारांकडे ओळखपत्र असल्याने त्यांना जाऊ  देण्यात येत होते. मात्र मजुरी करणारे व ठोक मानधन वा रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा मात्र आजचा रोजगार बुडाला असल्याची खंत काही मजुरांनी व्यक्त केली.

माध्यमांनाही मज्जाव

या बाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्याशी संपर्क होऊ  शकला नाही तर पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांनाही मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव केल्याने नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.