|| विकास महाडिक

राजकीय पटलावरील समीकरणे सातत्याने बदलत राहतात. नवी मुंबईतील राजकीय विश्वात सध्या स्थित्यंतरांचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचे विजय चौगुले भाजपच्या साथीने वडार समाजाचे राज्य पातळीवरील नेते म्हणून पुढे येत आहेत, तर दुसरीकडे राजकीय विजनवास संपविण्याच्या प्रतीक्षेत असलेले गणेश नाईक सेनेत स्वगृही परततील, असे बोलले जाऊ लागले आहे..

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. त्याचे संकेत नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेता व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या भाजप चंचुप्रवेशाने मिळालेले आहेत. चौगुले यांनी राज्यातील वडार समाजाची मोट गेली चार वर्षे बांधली आहे. राज्यात साठ लाख वडार समाज आहे. सध्या जातीनिहाय राजकारणाला महत्त्व आले आहे. त्यामुळेच कोळी समाजाचे नेतृत्व करणारे नवी मुंबईतील उद्योजक रमेश पाटील यांना कुणाच्याही ध्यानीमनी नसताना भाजपने विधान परिषद देऊन आमदार केले आहे. नवी मुंबईत आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात घेऊन चौगुले यांनी पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यातील वडार समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आणि त्यात ते काही अंशी यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अनेक रस्ते, धरणे आणि मोठमोठे प्रकल्प उभारण्यात वडार समाजाचे मोठे योगदान आहे. दगड फोडणाऱ्या या समाजाला अलीकडे यांत्रिकीकरणामुळे काम मिळेनासे झाले आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर या समाजालाही स्वतंत्र आरक्षण हवे आहे. त्यामुळे हा समाज अस्वस्थ असून तीच नस चौगुले यांनी पकडली आहे. नवी मुंबईत बऱ्यापैकी आार्थिकदृष्टय़ा जम बसविलेल्या चौगुले यांनी समाजाच्या या एकीकरणासाठी हात सैल सोडलेला आहे. त्यामुळे सोमवारी सोलापूरमध्ये झालेला वडार समाजाचा महामेळावा यशस्वी झाला. महामेळाव्याला झालेली गर्दी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौगुले यांना थेट राज्यमंत्री दर्जा देण्याची घोषणा केली. त्यामुळे चौगुले यांची राजकीय खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे नेते व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन आपल्या तंबूत ओढले आहे. त्यांना कॅबिनेट दर्जा जाहीर करण्यात आला आहे. पाटील मराठा समाजाचे नेतृत्वही करीत आहेत. त्यामुळे एकाच दगडात मुख्यमंत्र्यांनी दोन पक्षी मारले आहेत. माथाडी कामगार संघटनेत भाजपला स्थान नव्हते. यानिमित्ताने ते मिळाले आहे. तसेच मराठा समाजाच्या प्रतिनिधीलाही सत्तेत स्थान दिले.

पाटील येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मात्र त्या वेळी ती फक्त औपचारिक घोषणाच ठरेल. भाजपला बळकटी दिल्याच्या बदल्यात त्यांना ऐरोली किंवा साताऱ्यातून उमेदवारी मिळणार आहे. माथाडी संघटनेचे प्रबळ नेतृत्व आपल्याकडे खेचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मूळ साताऱ्याच्या चौगुले यांना आपल्या गोटात आणले आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेतेपदी असताना चौगुले यांचे गेली अनेक महिने शिवसेनेत मन रमेनासे झालेले होते. त्यात त्यांना डावलून पक्षाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळेही ते नाराज होते. दोनदा पराभव झाल्याने आगामी विधानसभा उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मातोश्रीने दिलेले आहेत. त्यामुळे चौगुले दुसरा पर्याय शोधत असतानाच दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्री दर्जा देणार असल्याचे जाहीर करून शिवसेनेत सुरुंग लावला आहे. त्यामुळे पाटील यांच्यापाठोपाठ चौगुले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी होतील हे स्पष्ट दिसून येत आहे. चौगुले यांच्या या राजकीय हालचालीवर नवी मुंबईतील अनेक राजकीय उलाढाली अवलंबून आहेत. ते शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याने राष्ट्रवादीचे येथील सर्वेसर्वा व माजी मंत्री गणेश नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नाईक यांचा हा स्वगृही प्रवेश आहे. त्या बदल्यात त्यांना ठाणे लोकसभा व दोन विधानसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या बदल्यात शिवसेनेचा पालिकेवर भगवा फडकणार आहे. नाईक यांनी शिवसेना प्रवेश केल्यास ऐरोली मतदारसंघातून बोहल्यावर चढण्यास उत्सुक असलेल्या अनेक हवशे, गवशे आणि नवशांचे पत्ते कापले जाणार आहेत. नाईक यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ फेकून दिल्यास राष्ट्रवादीत उभी फूट पडणार आहे. आमदार शशिकांत शिंदे हे नवी मुंबईतच राहात असून ते यानंतर राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक नाईक यांच्यासोबत जाणार नाहीत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे भाजपमध्ये तसे मन रमत नाही, पण मुख्यमंत्र्याबरोबर असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्या पक्षातून पुन्हा लढणार आहेत. याच भागातील नामदेव भगत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाच राज्यांत भाजपचा धुव्वा उडाल्यामुळे स्थानिक राजकारणातही नव्याने समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत.