नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार; पाण्याचा अपव्यय टळणार

लोकसत्ता वार्ताहर, नवी मुंबई : नवी मुंबई</strong>

महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य  रस्त्यांची प्रक्रियायुक्त पाण्याने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टळणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची ‘सी’ टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे ही पर्यावरणशील केंद्रे म्हणून जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांनी नावाजलेली आहेत. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून वापरायोग्य पाणी तयार केले जात आहे. हे पाणी काही मोठय़ा सोसायटय़ांना दिले जात आहे. तसेच महानगरपालिकेच्या बांधकामांसाठीही त्याचा काही प्रमाणात वापर होतो. त्याचप्रमाणे उद्याने व हरितपट्टे फुलविण्यासाठीही या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे.  नवी मुंबई हे मुंबई, ठाणे, पनवेल मार्गे पुणे अशा मुख्य शहरांना जोडणारे मध्यवर्ती शहर असून जेएनपीटी बंदर जवळच असल्याने येथील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक असते. या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे मुख्य रस्ते व त्या शेजारील पदपथांवर धूळ बसून ते काळवंडलेले दिसतात. त्यामुळे  हे प्रक्रियायुक्त पाणी रस्ते स्वच्छतेसाठी वापरण्यात येत आहे.

शहरातील मुख्य  रस्त्यांची  स्वच्छता प्रक्रियायुक्त पाण्याने करण्यात येत आहे.