औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण व जेएनपीटी बंदराला जोडण्यासाठी सिडको, जेएनपीटी, रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडून रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. उड्डाणपूलही उभारले जात आहेत; मात्र सध्या खड्डय़ांमुळे या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जलद वाहतुकीचे स्वप्न बाळगणाऱ्या या महामार्गात खड्डय़ांचे विघ्न आले आहे. खड्डय़ांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांतही वाढ झाली आहे. उड्डाणपुलांवरही खड्डय़ांचे साम्राज्य पसरू लागले आहे. याकडे येथील आस्थापनांचे दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. उरण तालुक्याला जोडणारा उरण पनवेल हा एकमेव मार्ग होता. या परिसरात ओएनजीसीचा प्रकल्प आल्यानंतर येथील वाहनांमध्ये वाढ होऊ लागली तसेच अंतर्गत रस्त्यांची संख्याही वाढू लागली. त्यानंतर आलेल्या जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर तर वाहनांच्या संख्येत हजारोंच्या संख्येत पोहोचली. त्यामुळे उरण पनवेल रस्त्याचे रुंदीकरण होऊन त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब असा पळस्पे फाटा ते जेएनपीटी महामार्ग नव्याने तयार करण्यात आला. या राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या कंटेनर वाहनांतही वाढ होऊन ती हजारोंच्या संख्येत गेल्याने या मार्गावरील कोंडीत वाढ होऊन ती नित्याचीच समस्या बनली आहे. त्यामुळे मुंबई रस्ता कंपनीने उरण पनवेल राज्य महामार्ग ५४ व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब च्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी २६०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मार्गाला खड्डे पडलेले आहेत. यात जासई नाका, शंकर मंदिर ते गव्हाण फाटा तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पागोटे पुलावरील खड्डय़ांकडे मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ते विकास प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अवजड वाहनांने धडक लागून अपघात होण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी करूनही ते दुरुस्त केले जात नसल्याचे येथील प्रवासी व नागरिकांचे म्हणणे आहे. तर उरण पनवेल महामार्गावरील जासई परिसरात असलेल्या डोंगरांमधून पावसामुळे नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यात पाणी साचू लागले आहे. पाऊस सुरू असताना रात्रीच्या वेळी या महामार्गातील खड्डे वाहनांना दिसत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत. संपूर्ण रस्तेच पाणीमय होत असल्याने रस्त्यांतील खड्डेही मोठे होऊ लागले आहेत. उरण शहर आणि जेएनपीटी भागाला जोडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा किलोमीटर मार्गाला याचा मोठा फटका बसला आहे. करळ पुलाजवळील हा मार्ग पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर मुंबई-गोवा ते मुंबई-पुणे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाना मुंबई व नवी मुंबईतून जोडणाऱ्या गव्हाण फाटा ते चिरनेर या महामार्गाचेही चौपदरीकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावरून होणाऱ्या कंटेनर वाहतुकीमुळे जांभूळपाडा, दिघोडे तसेच चिरनेर परिसरात महामार्गाला खड्डे पडलेले आहेत. तशाच प्रकारची स्थिती कोप्रोली ते साई मार्गाचीही झाली आहे. सिडकोकडून द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. असे असले तरी द्रोणागिरी नोडमधील पागोटे, भेंडखळ, भारत पेट्रोलियम घरगुती गॅस भरण सयंत्र या भागातील महामार्गातील रस्त्यांत खड्डे पडल्याने वाहनांना त्यातूनच आपला मार्ग काढावा लागत आहे. अशा प्रकारचे खड्डे जेएनपीटी बंदर परिसरातही झाले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. तर याच परिसरात विकासाच्या नावाने करण्यात आलेल्या भरावामुळे रस्त्यावर पाणी भरून वाहनांचे नुकसान होऊ लागले आहे. उरणमधील औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे संपूर्ण तालुक्यात रस्त्यांचे जाळे पसरू लागले आहे. यात चार पदरी, सहा पदरी, आठ पदरी रस्ते निर्माण केले जात आहेत. परंतु त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेत न केल्याने तसेच रस्त्यात पाणी साचू नये यासाठीच्या पावसाळ्यातील पाण्याचा रस्त्यावरून निचरा करणाऱ्या योजना केल्या जात नसल्याने रस्त्यावर पाणी साचत आहे. या परिसरातील रस्त्याच्या कडेला गटारांचा अभाव आहे. तसेच गटारे असलेल्या ठिकाणी त्यांची सफाई केली जात नसल्याने गटारे निकामी ठरू लागली आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. त्यानंतर करण्यात येणारी खड्डे भरण्याची कामे ही त्याच प्रकारची असल्याने खड्डे बुजण्याऐवजी ते अधिक वाढू लागले आहेत. या सर्वाचा परिणाम येथील रहिवाशी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शरीरावर होऊ लागला आहे. अनेकांना या रस्त्यातील खड्डय़ांमुळे कंबर तसेच मानेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी चांगल्या प्रतीचे रस्ते तयार करून त्याची देखभाल करण्याची मागणी होऊ लागली आहे.