पालकमंत्र्यांशी भेट झाली नसल्याचा नगरसेवक नवीन गवते यांचा दावा दिघा येथील दुसरे प्रबळ नगरसेवक नवीन गवते यांच्यासह दोन नगरसेवक शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहेत. गवते यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतल्याचे समजते, मात्र गवते यांनी या भेटीबाबत मौन बाळगले आहे. अनेक नगरसेवक माजी मंत्री गणेश नाईक यांची साथ सोडून जात आहेत. यात प्रथम तुर्भे येथील नगरसेवक आणि तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद मिळालेले सुरेश कुलकर्णी यांनी तीन सर्मथक नगरसेवकांसह शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. पालिका निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. कुलकर्णी यांनी पक्ष सोडण्याची घाई केलेली असतानाच त्यांच्या मागोमाग दिघा येथील नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती नवीन गवते हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. दिघा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी क्षेत्रातील पाच इमारती तोडण्याच्या काळापासून गवते यांची शिंदे यांच्याशी जवळीक वाढलेली आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील, असा अंदाज गेली अनेक महिने व्यक्त केला जात होता. नवीन गवते यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शेवटच्या वर्षांतील स्थायी समिती सभापतीपदही देण्यात आले आहे. गवते दाम्पत्याने मध्यंतरी महापौरांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. गवते यांची नुकतीच शिंदे यांच्याशी बैठक होऊन नाईक यांच्यासोबत गेलेल्या भाजपला जय महाराष्ट्र करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते, मात्र गवते यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्रे पालकमंत्री शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहेत. स्वबळावर निवडून येणाऱ्या वजनदार नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्याचा शिंदे यांचा जोरदार प्रयत्न राहणार आहे. शिवसेनेचे महापालिका सभागृहातील संख्याबळ सध्या १११ नगरसेवकांच्या तुलनेत ३८ नगरसेवकांचे आहे. मावळत्या सभागृहात ही संख्या ५१ नगरसेवकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पालिका सभागृहात बहुमतासाठी ५६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता गवते हेसुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याने भाजपमधील नाईक यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ‘आहे तिथे ठीक’ ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची अलीकडे भेट झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी सध्या आहे त्या ठिकाणी ठीक आहे, अशी प्रतिक्रिया नवीन गवते यांनी दिली. ‘मविआ’बद्दल चर्चा थंड पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सुरू झालेल्या बैठका सध्या शांत झाल्या आहेत. महाविकास आघाडी होणारच असे दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते सांगत आहेत, पण वरिष्ठ नेते याबाबत सध्या फारशी चर्चा करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेला या वेळी ‘अच्छे दिन’ येण्याची खात्री वाटू लागली आहे. शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने स्वबळाचा नारा पक्षात घुमू लागला आहे.