नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता या पदावरील अभियंत्यांना तात्पुरत्या स्वरुपात सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावर देण्यात आलेल्या पदोन्नतीला महापालिका आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी तातडीने दिलेली स्थगिती सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रशासन विभागातील बदली, बढत्यांमधील अनेक सुरस कथा यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या अभियंत्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देत असताना प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी केलेल्या काही विभाग अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घणसोली, तुर्भे याठिकाणी नेमण्यात आलेले काही विभाग अधिकारी तसेच मालमत्ता कर विभागातून करण्यात आलेल्या बदल्यांमागील कारणांच्या चर्चामुळे महापालिकेतील संपूर्ण यंत्रणेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या सर्व बदल्या आणि बढत्यांचा निर्णय प्रशासकीय सोयीनुसारच घेण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी अभियंता विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या १२ अभियंत्यांना खुल्या प्रवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सहाय्यक अभियंता या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील अभियंता विभागाला बळकटी मिळावी आणि काही नव्या तरुण दमाच्या अभियंत्यांची फळी उभी रहावी असा उद्देश यामागे होता असेही बोलले गेले. काही दिवसांनंतर मात्र या १२ अभियंत्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याची वेळ आयुक्त शिंदे यांच्यावर ओढावली. आयुक्तांवर तडकाफडकी निर्णय घेण्याची ही नामुष्की का ओढावली याच्याही सुरस कथा आता महापालिका वर्तुळात चर्चेत आहेत.
कनिष्ठ अभियंत्यांच्या बढती प्रक्रियेत तोंडावर पडलेल्या प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी काही विभाग अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महापालिका वर्तुळात मोक्याच्या जागा पटकाविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. गेल्या आठवड्यात यापैकी काही बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील उत्तम खरात यांची घणसोली येथे विभाग अधिकारी म्हणून तर मालमत्ता कर विभागातील सुखदेव येडवे यांची वाशीत बदली करण्यात आली. अभियंता विभागाच्या पदोन्नती गोंधळात कोण जबाबदार होते याची जाहीर चर्चा महापालिकेत असतानाही त्यापैकी काहींना मोक्याचे विभाग अधिकारी पद कसे मिळेल याची पुरेपूर काळजी प्रशासन विभागातील काही प्रभावी मंडळींनी घेतल्याची सांगितले जाते.
ज्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा ‘सागर’ सातत्याने उसळतो त्याच अधिकाऱ्यांना मोक्याचा विभाग देण्याची कामगिरी प्रशासन विभागाने कशी बजावली आणि त्यासाठी कोणाकोणाला ‘नैवेद्य’ दाखविण्यात आले याविषयी महापालिका मुख्यालयात जाहीर चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी मोबाइलला प्रतिसाद दिला नाही.
‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपवर जमवाजमव?
पदोन्नतीचा निर्णय प्रक्रियेत असताना काही अभियंत्यांनी एकत्र येऊन तयार केलेला ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुप आणि या गटावर बढतीसाठी आवश्यक ‘जमवाजमवी’साठी केलेल्या संदेशांचे वहन उघडकीस आले आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. ही जमवाजमव नेमकी कुणासाठी केली जात होती याविषयी महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा असली तरी वरिष्ठ अधिकारी मात्र एकमेकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे आता चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या माना आवाळण्यापेक्षा या संपूर्ण प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची क्लृप्ती आता लढविण्यात आल्याचे चित्र आहे.