नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळेच्या विद्यार्थ्याचा सहलीदरम्यान झालेल्या मृत्यूनंतर सहलींच्या आयोजनासंदर्भात विविध स्तरांतून आरोप प्रत्यारोप होत आहेत. शाळांनी शैक्षणिक सहली कोणत्या ठिकाणी, कधी न्याव्यात, त्यांचे नियोजन कसे असावे याबाबत, राज्य सरकारने २०१६ साली परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र नवी मुंबई पालिका शाळेनेच त्याचे उल्लंघन केल्याचे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची खालापूर येथील इमॅजिका या ॲडव्हेंचर पार्क येथे सहल आयोजित केली होती. या सहलीदरम्यान घणसोली शाळा क्रमांक ७६ मधील आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या असताना या कालावधीत प्राथमिक विभागांच्या सहलीचा घाट घातला गेला होता. शिवाय ही शैक्षणिक सहल असूनही ॲडव्हेंचर पार्कमध्ये नेण्यात आली होती. २०१६ साली मुरुड-जंजिरा येथे आलेल्या पुण्याच्या शाळेच्या सहलीतील काही विद्यार्थी बुडून मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर जोखीम असलेल्या ठिकाणी सहल नेण्यास प्रतिबंध करणारे आदेश शासनाने जारी केले होते. मात्र नवी मुंबई पालिकेनेच या शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या असताना या कालावधीत प्राथमिक विभागांच्या सहलीचा घाट कशासाठी घातला गेला, असा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त व शिक्षणाधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

नियमावलीत काय?

  • समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतावरील ठिकाणे. नदी, विहीरी आदी जोखमीच्या ठिकाणी सहली नेऊ नयेत.
  • ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी शैक्षणिक सहली नेण्यात याव्यात असे राज्य सरकारचे निर्देश आहेत.
  • सहलीच्या नियोजनाचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवावा, पालकांच्या सूचना विचारात घ्याव्यात.
  • दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा.
  • मुलांना एकटेदुकटे सोडू नये.