रायगडमधील सर्वाधिक पाऊस
उरण तालुक्यात सुरुवातीला दडी मारलेल्या परतीच्या पावसाने रविवारी या परिसराला चांगलेच झोडपले. रायगड जिल्ह्य़ात रविवारी सर्वदूर पाऊस कोसळला, मात्र त्याची सर्वाधिक नोंद उरणमध्ये झाली. रविवारी उरण तालुक्यात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे समजते.
राज्याप्रमाणे यंदा उरणमध्ये कमी पर्जन्यमान झाले आहे. उरणलाही भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. मागील शुक्रवारपासून परतीच्या पावसाने उरण तालुक्यात हजेरी लावल्याने उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र विजेच्या कडकडाटासह येणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसानही झाले, तर चाणजे, जेएनपीटी कामगार वसाहतीतील झाडे उन्मळून पडली. या पावसामुळे वीजही गायब होत असल्याने लोकांवर अंधारात राहाण्याची वेळ आली. या पावसामुळे भातशेतीची उभी पिके आडवी झाल्याचे चिरनेर येथील शेतकरी जयवंत ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे पिकलेले भात मुदतीपूर्वीच कापण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात दोन घरांचे विजेमुळे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या घरांचे पंचनामे करून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर शासनाकडून ३० ते ३५ हजारांची नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही ते म्हणाले.