छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेलदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उन्नत मार्गाच्या घोषणेव्यतिरिक्त नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील महामुंबई क्षेत्रावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची कृपादृष्टी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या मार्गावर गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येणारी जलद रेल्वेची मागणी आजही बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. कुर्ला ते पनवेल मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याच्या मागणीचाही विचार करण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त अलिबाग, नागोठणे या वाढत्या नागरीकरण होत असलेल्या शहरांना जोडणाऱ्या मार्गाची तीन वर्षां पूर्वी केलेली घोषणा हवेत विरून गेली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
वीस वर्षांपूर्वी मानखुर्द ते वाशी मार्गावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वेने नवी मुंबईत ठाणे ते पनवेल मार्गामुळे एक चतुष्कोन तयार झाला आहे. या सेवेनंतरच नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. नवी मुंबईतून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. शैक्षणिक पंढरी असलेल्या नवी मुंबईमुळे यात विद्यार्थी संख्येचा समावेश जास्त आहे. कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल, नवी मुंबई आणि जेएनपीटीमुळे मोठय़ा प्रमाणात विस्तारित होत आहे. उरण भागाकडे प्रभूंनी कृपादृष्टी टाकली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लागणाऱ्या सीएसटी ते पनवेल या उन्नत मार्गाशिवाय महामुंबईच्या पदरात निराशाच पडली आहे. या भागात आज एकही जलद रेल्वे धावत नाही. रेल्वे सेवा सुरू होऊन वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही जलद रेल्वेचा अनुभव महामुंबईकरांना घेता आलेला नाही. या दोन प्रमुख मार्गावर धावणारे लाखो प्रवासी या जलद मार्गाची गेली पाच वर्षे मागणी करीत आहेत. सिडकोच्या ताब्यात असलेली रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होत नसल्याने त्याचे उत्तरदायित्व कोणाकडे असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यात आलेली नवी मुंबईतील रेल्वे स्थानके आजही उपेक्षित आहेत. त्याचा प्रशासकीय पातळीवर निर्णय लावला जात नाही. ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवली जात नसल्याने सकाळ, संध्याकाळ नवी मुंबईतून मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यात गर्दीमुळे चालत्या गाडीतून काही विद्यार्थी पडून मृत्यू पावले आहेत. सिडकोकृपेने चालणाऱ्या महामुंबईतील रेल्वे सेवेवर ‘प्रभु’कृपादेखील होऊ शकलेली नाही. आघाडी सरकारच्या काळात पनवेल ते अलिबाग, नागोठणे ही सेवा लोकल करण्याची घोषणा करण्यात आली होती. तो प्रस्तावदेखील अडगळीत पडला असून त्याचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. या भागात खूप मोठय़ा प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. रेल्वे सेवेच्या दृष्टीने त्याचे आत्तापासून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पनवेल कर्जत सेवेलाही या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे महामुंबईच्या दृष्टीने हा रेल्वे अर्थसंकल्प निराशजनक आहे.

मुंबई, नवी मुंबई, नंतर आता महामुंबई क्षेत्राला भविष्यात खूप मोठे महत्त्व येणार आहे. रेल्वे सेवा ही विकासाची गंगोत्री मानली गेली आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण, अलिबाग, नागोठणे या क्षेत्रातील रेल्वे सेवेचे नियोजन करण्याची गरज आहे, पण कोकणचे सुपुत्र असलेल्या सुरेश प्रभूंनीदेखील या जनतेकडे लक्ष दिलेले नाही. त्यात महामुंबईत जलद रेल्वेचे मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत.
– प्रफ्रुल्ल म्हात्रे, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय प्रवासी सेवा संघ, मुंबई