अलेक्झांडर किनगहॅम हे भारतातील ब्रिटिश सेनेच्या बंगाल इंजिनीअर विभागात इंजिनीअर होते. पुढे ते भारतीय पुरातत्त्व, इतिहास आणि भूगोल यांचे अभ्यासक आणि विद्वान म्हणून प्रसिद्धी पावले. अलेक्झांडर किनगहॅम हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे जनक मानले जातात. ब्रिटिश सेनेच्या सेवेतून ते निवृत्त होताना मेजर जनरल या पदावर होते. १८८७ साली त्यांना ‘नाइट कमांडर ऑफ इंडियन एम्पायर’ हा पुरस्कार देण्यात आला. अलेक्झांडर यांचा जन्म लंडनमध्ये १८१४ सालचा, वडील अॅलन किनगहॅम हे स्कॉटिश कवी. लंडनच्या क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये शिक्षणानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशिक्षण शाळेत शिक्षण घेऊन, अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी रॉयल इंजिनीअर्स इस्टेट येथे केले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांची नियुक्ती बंगाल इंजिनीअर्समध्ये कलकत्ता येथे सेकंड लेफ्टनंट म्हणून झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवाकाळाच्या प्रारंभापासूनच अलेक्झांडरना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संवर्धन कार्याबद्दल रुची निर्माण झाली. त्या काळातील प्रख्यात पुरातत्त्व सर्वेक्षक जेम्स प्रिन्सेप आणि प्राचीन भारतीय वसतिस्थानांचे संशोधक मेजर किट्टो या दोघांना अलेक्झांडर किनगहॅम यांनी मोलाची मदत केली. त्यानंतर अनेक उत्खनने अलेक्झांडरनी स्वखर्चाने केली. अलेक्झांडर यांनी बौद्ध धर्मीयांचे पवित्र श्रद्धास्थान सारनाथ (१८३७) आणि सांची (१८५०) येथे उत्खनन करून तेथील शिल्पे आणि अवशेषांचे प्रमाणबद्ध नकाशे व चित्रे तयार केली. भारतासारख्या अवाढव्य प्रदेशाचे पुरातात्त्विक सर्वेक्षण, हे एकटय़ा-दुकटय़ाचे काम नसून यासाठी एका विस्तृत पायावर संस्था स्थापून आíथक व्यवस्था करणे आवश्यक आहे हे अलेक्झांडरनी सरकारच्या लक्षात आणून दिले. त्यानुसार १८६१ मध्ये लॉर्ड कॅिनग यांनी ‘ऑर्किऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया’ची स्थापना करून अलेक्झांडरना त्याचे पहिले सर्वेक्षक नेमले. थोडय़ाच काळात त्यांची नियुक्ती उत्तर भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकपदी झाली. या काळात अलेक्झांडर यांनी प्राचीन भारताच्या अज्ञात इतिहासाची अनेक पाने जगासमोर उघडली. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com