आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र विचारात मग्न असते. पण हे लक्षात आले की ध्यान वर्तमान क्षणात आणायचे. शरीराला होणारा पाण्याचा स्पर्श जाणायचा. साबणाचा, शाम्पूचा वास अनुभवायचा. अंग पुसण्याची कृती सजगतेने करायची. असे करू लागतो, त्या वेळी आंघोळीचा आनंद अनुभवता येतो. नाही तर घाईघाईने आंघोळ उरकली जाते.

सजगतेने आंघोळ करताना वेगळा वेळ द्यावा लागत नाही, त्यामुळे ‘वेळ नाही म्हणून हा सराव होत नाही’ ही सबब येथे चालत नाही. सजगतेच्या सरावासाठी आपले मन वर्तमान क्षणात नाही याचे भान पुरेसे असते. ते भान आले की पश्चात्ताप करीत न राहता, चिडचिड न करता लक्ष वर्तमान क्षणातील कृतीवर आणि ज्ञानेंद्रिये देत असलेल्या माहितीवर आणायचे. हे पुन:पुन्हा करायचे.

असेच जेवताना, चहा-पाणी पितानाही करायचे. घास चावताना त्याकडे लक्ष द्यायचे; त्यामुळे अन्नाची चव बदलते का, हे उत्सुकतेने जाणायचे. सध्या बरेच जण टीव्ही पाहत जेवत असतात, मोबाइल पाहत चहा पीत असतात. त्यामुळे आपण किती खातो आहे, याचे भानच नसते आणि त्या चवीचा आनंददेखील मिळत नाही. चवीने जेवू लागलो की थोडे खाऊनही समाधान वाटते.

माणूस सोडून अन्य सारे प्राणी नेहमी वर्तमानात असतात. त्या प्राण्यांच्या आणि माणसाच्या मेंदूत एक महत्त्वाचा फरक आहे. माणसाच्या मेंदूच्या पुढील भागातील ‘लॅटरल’ म्हणजे बाहेरच्या बाजूचा भाग अधिक विकसित आहे. या भागामुळेच आपण अमूर्त विचार करू शकतो, समोर जे नाही त्याची कल्पना करू शकतो, भविष्याची स्वप्ने पाहू शकतो. अन्य प्राणी हे करू शकत नाहीत, ते सतत क्षणस्थ असतात.

मात्र, सजगतेचा सराव करायचा म्हणजे आपण प्राणी व्हायचे असे नाही. अमूर्त विचार करणे, भविष्याचे नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे. ते करायलाच हवे. परंतु तेच सतत करत राहिलो की मेंदू थकतो, मानसिक तणाव येऊ लागतो. तो कमी करण्यासाठी अधूनमधून क्षणस्थ व्हायला हवे. मेंदूतील ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’ला विश्रांती देण्यासाठी शरीराच्या हालचालींवर किंवा रूप, रस, गंध, ध्वनी आणि स्पर्श यांवर लक्ष द्यायला हवे! – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com