मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने निसर्गाने योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. परंतु या संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये आणि वापरामध्ये होणाऱ्या आपल्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे आणि कृतींमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या विविधतेची कधीही भरून न येणारी हानी होते आहे. जैवविविधतेचा ऱ्हास हा पर्यावरणासाठी आणि एकंदरीत मानवी आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची संख्या, त्यांचा भौगोलिक प्रसार कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर आज, ५ जून रोजी संयुक्त राष्ट्रांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र ‘जैवविविधता’ हेच ठरवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांकडून यंदाचे पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषविण्याचा मान अतिशय विपुल आणि समृद्ध जैवविविधता असलेल्या कोलंबिया (दक्षिण अमेरिकेतील एक राष्ट्र) आणि जर्मनी या देशांना मिळाला आहे. पृथ्वीवरील एकूण जैवविविधतेच्या तब्बल दहा टक्के जैवविविधता कोलंबिया देशात आढळते. पक्ष्यांची आणि ऑर्किड या पुष्पवनस्पती प्रजातींतील विविधता या देशात सर्वाधिक आहे. तसेच इतर वनस्पती, फुलपाखरे, गोडय़ा पाण्यातील मासे, उभयचर प्राणी यांचीही विविधता येथे विपुल आहे. जगात साधारणपणे १९६०-७० च्या दशकांत ढासळत्या जैविक संसाधनांबद्दल जनमानसात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली. १९७२ साली संयुक्त राष्ट्रांच्या वतीने स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्यासाठी ५ ते १६ जून या काळात एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गातील सर्व घटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रांच्या सहभागाने एक ठोस कृती आराखडा आखण्यासाठी आयोजित केलेली ही पहिलीच परिषद होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण राहावे म्हणून दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून पाळण्यात यावा, असा ठराव या परिषदेत करण्यात आला. आता जगभरातील १५० हून अधिक देश हा दिवस साजरा करतात. गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय आव्हानांनी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या समस्या तर सर्वस्पर्शी झाल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी करायची, तर जैवविविधतेच्या संवर्धनाशिवाय पर्याय नाही, याविषयी जगभरात एकमत झाले आहे. याबद्दल धोरणात्मक पावले उचलली जातीलच/ जायला हवीत; त्यासाठी आपणही जागरूक राहिले पाहिजेच; पण या दृष्टीने वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? तर, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, परिसरातील जैवविविधतेची, झाडाझुडपांची काळजी घेणे, तसेच प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची दक्षता घेणे हे आपणास सहज करता येईल. - रूपाली शाईवाले मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org