लिखित नमुन्याच्या अनेक प्रती हव्या असतील तर आता झेरॉक्स, कॅम्प्युटर यांसारखी यंत्रं वापरून मिळविता येतात. पण जर ही यंत्रं उपलब्ध नसतील तर मात्र आपल्याला ‘कार्बन पेपर’चा आधार घ्यावा लागतो. हा कार्बन पेपर म्हणजे नक्की काय असतं, की ज्यामुळे थोडा जरी दाब पडला तरी त्याखालील पानावर रंग उतरतो? कार्बन पेपर म्हणजे मेणासारखा पदार्थ व रंगद्रव्य यांच्या मिश्रणाचा पातळ लेप दिलेला व एकाच वेळी एक किंवा अधिक प्रती काढण्यासाठी वापरण्यात येणारा कागद होय. दोन कोऱ्या कागदांमध्ये कार्बन कागद योग्य रितीनं ठेवून वरील कोऱ्या कागदावर दाब देऊन जे लिहिलं किंवा रेखाटलं जातं त्याची हुबेहूब नक्कल खालील कोऱ्या कागदावर मिळते. कारण कार्बन कागदावरील रंगद्रव्य कागदापासून सुटं होऊ शकणारं असतं व त्यामुळे दाब दिलेल्या भागावरचं काही रंगद्रव्य खालील कोऱ्या कागदावर गेल्यानं नक्कल निघते. अशा कागदावरील काळ्या रंगासाठी काजळी किंवा ग्रॅफाइट (कार्बनचं अपरूप) वापरत असल्यामुळे ‘कार्बन कागद’ हे नाव पडलं असावं.
यासाठी लागणारा कागद चिंध्या, लाकूड व ताग यांच्यापासून तयार करतात. तो पातळ, चिवट व टिकाऊ असावा लागतो. साधं मेण व माँटन, जपान, पॅरोफीन, कार्नुबा यांसारखी मेणं व ओलीन, रोझीन यांच्यासारखे पदार्थ लेपासाठी वापरतात. काळ्या कागदासाठी नेहमी काजळी तर इतर रंगांसाठी ब्राँझ निळा, व्हिक्टोरिया निळा, मिलोरी निळा, अल्ट्रामरीन, इंडिगो, कॅरमीन इ. रंगद्रव्ये किंवा त्यांची मिश्रणं व अॅयनिलीन रंजकद्रव्यं किंवा फॅटी अॉसिडमध्ये विद्राव्य अशी रंजकद्रव्यं वापरतात.
    आधुनिक पद्धतीमध्ये लेपाचे मिश्रण तयार करणे व कागदावर लेप देणे या दोन प्रमुख प्रक्रिया असतात. मेणे व इतर पदार्थ सुमारे १५०० सें. तापमानाला वितळवितात, नंतर रंगद्रव्य टाकून मिश्रण एकजीव करतात. टंकलेखन यंत्रांमध्ये सटकू नये व चांगला दिसावा म्हणून त्याच्या दुसऱ्या बाजूवर न चिकटणारा व जलशोषक नसलेला असा मेणाचा थर देतात.
विविध रंगांचे कार्बन कागद उपलब्ध असले तरी काळा, निळा, जांभळा आणि तांबडा हे रंग अधिक वापरले जातात.

प्रबोधन पर्व: ईश्वराचा पंचनामा
दारिद्रयाशी व श्रीमंतीशी पूर्वजन्मीच्या कर्माचा काही संबंध नाही. उच्च वर्गातील सत्ताधारी लोकांनी आपल्या स्वार्थाचे व श्रेष्ठ पदवीचे समर्थन व रक्षण करण्याकरिता पुनर्जन्म कल्पनेला महत्त्व दिले आहे. हीन स्थितीतल्या दीन जनतेला चालू गुलामगिरीत आणि पतित स्थितीत डांबून ठेवण्याकरिता कर्मविपाकाच्या सिद्धान्ताचा उपयोग आजपर्यंत वरिष्ठ वर्ग करीत आले आहेत. कर्मविपाकाचा सिद्धान्त म्हणजे समाजातील दीन बहुजनसामाजाला दुर्दैवाच्या बंधनात शाश्वत कालपर्यंत डांबून ठेवण्याकरिता घडविलेले अमोघ शस्त्र होय.. .. ते स्वत:च त्या परिस्थितीला जबाबदार आहेत; असा भ्रम किंवा आत्मवंचना दृढमूल करण्याचे कार्य हा आत्मवाद, कर्मविपाकवाद आणि पुनर्जन्मवाद करतो.. पुनर्जन्म मानणाऱ्या आत्मवादी विचारसरणीने मनुष्यजातीचा जितका अध:पात केला आहे तितका दुसऱ्या कोणत्याच विचारसरणीने केला नसेल; कारण भोवतालच्या जीवनविरोधी परिस्थितीचे व घातकी वस्तुस्थितीचे अवलोकन करणारा विवेकचक्षूच या विचारसरणीने अंधळा केला आहे. बुद्धिभ्रंश करणाऱ्या विचारसरणीस अध्यात्मवाद हे अभिधान तरी कसे द्यावे? कारण ही विचारसरणी आत्म्याचे ज्ञानस्वरूपच मलिन करून टाकते.’’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुनर्जन्म संकल्पनेचा समाचार घेत ईश्वराचा पंचनामा करताना लिहितात – ‘‘नीती ही सामाजिक गरज आहे आणि मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, एवढा विचार नीतीचे समर्थन करण्यास पूर्ण समर्थ आहे. त्याकरिता देहाव्यतिरिक्त आत्मा, पुनर्जन्म, पापपुण्य आणि जीवनाचे नियंत्रण करणारा ईश्वर मानण्याची जरूर नाही. हे मानल्यामुळे नीतीचा पाया खंबीर होत नाही. उलट नीती जेव्हा अनीतीचे रूप धारण करते व मनुष्याच्या माणुसकीचा घात करण्याकरिता पुढे सरसावते, तेव्हा या घातकी आत्मनाशक परिस्थितीला संभाळण्याचे काम या ईश्वर कल्पना करतात. कारण या कल्पना देशकालपरिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या आचारांना शाश्वत मूल्य देतात. अशाश्वताला शाश्वत आहे असे दाखविणारी कल्पनाच सगळ्यात मोठी भ्रांती होय.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

मनमोराचा पिसारा: श्वास घे..
‘मानसी, मानसी अगदी आत्ताच बोलायला हवं का?’ मानस त्रासिकपणे म्हणाला. ‘हं.. म्हणजे, आत्ताच बोलायला पाहिजे असं नाही, पण जे सांगणारेय ते या क्षणी तुझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ऐकशील का? म्हणजे मी शांतपणेच सांगीन.’
‘हे बघ मानसी, यू आर माय इनर व्हॉइस. तू माझा खासगी आतला आवाज आहेस, पण हे भुक्कड टीव्ही सीरियलमधली पात्रं चाचरत-चाचरत, आवंढा गिळत, चेहऱ्यावर नितांत सात्त्विक हळवे भाव ठेवून बोलतात तसं बोलू नकोस प्लीज.’
‘मला खूप कामं आहेत. ठरल्याप्रमाणे काही होत नाहीये. काहीही धड होत नाहीये आणि तू असले डायलॉग मारू नकोस..’ मानस त्रासिकपणे स्वत:शी म्हणाला.
‘नाही रे, तसं नाही. पण.. म्हणजे तू एक महत्त्वाची गोष्ट विसरला आहेस, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? म्हणजे सॉरी; पण, शांतपणेच सांगत्येय..’ मानसी कनवाळू आवाजात म्हणाली.
‘क्काय?’ मानसनं थबकून स्वत:ला विचारलं तो  दचकून थांबला. ‘कानाखाली एक वाजवू का?’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.
‘तू श्वास घ्यायला विसरतोयस म्हणजे तू जसे श्वास घ्यायला हवेस, तसे घेत नाहीयेस. तू खूप श्ॉलो ब्रीद करतोयस. तुझा श्वास वरचेवर होतोय. काही क्षण तर तू श्वास रोखून धरतोयस.. आणि या क्षणी विचारशील तर थोडी चिडचिड होत असल्याने तू फास्ट ब्रीद करतोयेस. रागाचा स्फोट होण्यापूर्वी आपण जोरात-जोरात श्वास घेतो. नाक फुलवून छातीच्या भात्यात हवा भरावी तशी भरतो. बाहेरची शुद्ध प्राणयुक्त हवा छातीत पूर्णपणे भरण्याआधीच उच्छ्श्वास सोडतोयेस. चिडून बोलण्यापूर्वी आपण असा चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छ्वास करतो, तसं तुझं होतंय.. ऐकतोयेस ना?’
अचानक थंड हवेचा झोत अंगावर आल्यावर थबकावं तसं मानसचं झालं. त्यानं नकळतपणे दीर्घ श्वास घेतला आणि उच्छ्वास सोडला. ‘अजून एकदा असाच दीर्घ श्वास घे आणि घाईघाईनं नाही.. तर हलकेच हळूहळू सोड,’ मानसी सहज शांतपणे म्हणाली.
पुन्हा एकदा दीर्घ श्वास घे आणि सोडताना खांदे ढिले सोड.. पुन्हा दीर्घ श्वास, सोडताना कपाळावरच्या आठय़ा पुसून टाक..’ ‘व्वा! मस्त वाटलं गं,’ मानस म्हणाला, ‘पुन्हा करू दीर्घ श्वसन!’ ‘होऽऽ’ मानसी म्हणाली.
मानसनं घडय़ाळात बघितलं तर या प्रक्रियेला जेमतेम दीड-दोन मिनिटंच लागली होती. ‘मानसी, एकदम क्लिअर झालं गं डोकं! आणि हे काय, काम तर ठीकच चाललंय. चार-दोन गोष्टी करायच्या राहिल्यात आणि इतक्या वेळ शोधत असलेली ही कागदपत्रं इथेच तर आहेत,’ मानस रिलॅक्स होऊन म्हणाला.
‘आपण घाईगर्दीच्या कामात असलो ना की श्वास घ्यायला विसरतो आणि नेमकी अशा तणावात श्वासाचं भान ठेवणं खूप आवश्यक असतं. म्हणून तुला आठवण करून दिली!’ मानसी म्हणाली.
‘पण माझं नेहमी असं होतं गं!’ मानस म्हणाला. ‘होतं खरं!! माणसांचा स्वभाव तसा असतो. लक्षात ठेवून श्वासाचं भान ठेवलंस की आपोआप तुझा श्वास नियमित होईल. गंमत म्हणजे दीर्घ श्वसन केलं की मेंदूला हवा तेवढा प्राणवायू मिळतो आणि तणाव नाहीसा होऊन तो तरतरीत होतो. आता एक निश्चय करू.. रोज प्राणायाम करू. म्हणजे श्वास घ्यायला विसरणार नाहीस.’
मानस खुदकन हसला.
डॉ.राजेंद्र बर्वे