सध्या इंधनतेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे तेलाचा दुसरा कुठला तरी अवांतर स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवाळाचा उपयोग या कामासाठी होऊ शकतो. सूक्ष्म शेवाळे प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व पाणी वापरून इतकी कबरेदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने तयार करतात की त्यावर त्यांचे व समुद्रातील सर्व प्राण्यांचे पोट भरते. अगदी पृथ्वीवरच्या वनस्पतीप्रमाणे!
१९४२ पासून सूक्ष्म शेवाळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आतापर्यंत जवळ जवळ ३००० शेवाळाच्या जातींचे परीक्षण करण्यात आले असून त्यांमधील स्निग्धतेचा अंश कसा वाढवता येईल यावर काम सुरू आहे. पाण्याचे तापमान, त्यातील क्षार, रसायने, त्यात वाढणारे जीवजंतू व इतर सूक्ष्म गोष्टींवर त्यांची वाढ अवलंबून असते. शेवाळापासून किती व कशा प्रतीचे तेल मिळेल हे त्या शेवाळाच्या जातीवर, त्यांच्यामधील जनुकांवर व वातावरणाच्या परिणामावर अवलंबून असते. शेवाळे कुठेही वाढतात. त्यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सहसा शेवाळांची वाढ लहान-लहान तलावांत करतात. तलावांत विशिष्ट शेवाळाच्या जाती (उदा. Scenedesmus dimorphus,  Dunaliella tertiolecta,  Bacilliarophyta (diatom) वाढवतात. यातील काही शेवाळांमध्ये तर अनुकूल वातावरणात ३७ टक्क्यांपर्यंत तेल तयार होऊ शकते. असे म्हणतात की काही शेवाळांच्या जातीपासून दर वर्षांला एकरी ५००० ते १५००० हजार गॅलन इतके उत्पादन मिळू शकते. हे तेलबियापासून मिळणाऱ्या तेलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. शेवाळांना नेमके कोणते क्षार किती प्रमाणात घालावे की त्याची चांगली वाढ होईल ते शोधून काढावे लागते. काही शेवाळांना कबरेदके घालावी लागतात, तर काहींना सिलिकॉनची गरज असते. काही शेवाळे नायट्रोजनचा पुरवठा कमी केला की जास्त मेदाम्ले बनवितात. शेवाळांची वाढ झाली की पाण्यामधून निथरून मगच त्यापासून तेल काढावे लागते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या ढेपेत खूप प्रथिने असतात व ती पूरक खाद्य म्हणून वापरता येतात. हे तलाव उघडे असतात. त्यामुळे त्यावरील वातावरणावर अंकुश ठेवणे व वाढ होणाऱ्या शेवाळाच्या प्रतीची शुद्धता ठेवणे कठीण जाते. सध्या तर शेवाळाची जनुके बदलण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
‘विद्यादान’ हे श्रेष्ठ प्रतीचे दान
‘दानधर्म केला म्हणजे पुण्याचे हंडेच्या हंडे हाती लागतात, अशी आपल्या लोकांची समजूत असल्यामुळे मागचा पुढचा विचार न करता जो तो दानधर्म करण्यास धडपडतो. मग दान घेणारे खरेच दान घेण्यास पात्र आहेत की नाहीत? किंवा ज्यास दान केले असता आपल्या दु:खाचा भार खराच कमी होतो की काय? अथवा ज्यास दान केले ते दानाच्या बळावर उन्मत्त होऊन अनाचार करतात की काय? याचा कोणी विचार करीत नाही! दान करायचे म्हणून करायचे! म्हणजे आपल्या जवळचे पैसे दुसऱ्यास द्यावयाचे हाच दानाचा अर्थ!..
आपले लोक स्वत:चा पैसा व आयुष्याचे अमोल दिवस खर्च करून, पुण्यात संपादण्यासाठी म्हणून ज्या क्षेत्रोपाध्यांना लाखो रुपये पाण्यात भिजवून देतात ते त्या दानाच्या पैशावर मस्त होऊन कसे ढंग करतात याचा विचार आमच्या मंडळाने अवश्य केला पाहिजे व अज्ञान लोकांचे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘तीर्थशुद्धी मंडळ’ नावाची एखादी संस्था होणे आवश्यक होय.’’
दानधर्मातील विसंगत गोष्टींकडे लक्ष वेधत ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील विद्यादानाचे महत्त्न सांगतात –
‘‘दान केल्याने स्वर्गात काय मिळते हे जरी न समजले तरी, एवढे मात्र खरे की, सोन्याचांदीची भांडारगृहे दान देता देता रिकामी झाली व मोठमोठे कुबेर भिकारी झाले म्हणजे त्यांच्या जवळचे सगळे धन संपले; पण विद्यादान करणारा जवळचे विद्याद्रव्य कधीही संपल्याचे उदाहरण अद्याप घडले नाही. फार काय, दान करणाऱ्यास जीवंतपणीच ते स्वत:च्या जवळ दुप्पट चौपट वाढल्याची हजारो उदाहरणे देता येतील! यावरून इतर सर्व दानांहून ‘विद्यादान’ हे श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. यास स्वर्गाचा पाठिंबा नको इतके हे श्रेष्ठ आहे. पण अशा श्रेष्ठ प्रतीच्या दानावर एकही पुराण झाले नाही हा पुराणकर्त्यांचा विसरभोळेपणा कोणत्या जातीचा होता तो वाचकच शोधून काढोत.’’  

मनमोराचा पिसारा
मनावर राज्य कुणाचं?
आपण सिनेमा पाहात असतो, मध्यंतर होतं आणि आपण फॉयरमध्ये जाऊन पॉपकॉर्न, आईस्क्रीम किंवा शीतपेये घेतो. पुन्हा सिनेमा पाहू लागतो. हा सर्वसामान्य अनुभव आहे. यात विशेष काय? असतं, अगदी खास गोष्ट असू शकते. एका बंदिस्त ठिकाणी नजर खिळविलेल्या प्रेक्षकांत जो ‘गिऱ्हाईक’ असतो. तो मध्यंतरात कोणतं शीतपेय घेतो? कोणते पॉपकॉन खातो? यावर आपण सहज अंमल ठेवून आपल्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करू शकतो.
या विचारावर प्रयोगानिशी संशोधन करून त्यावर मानसिक सिद्धांत मांडता येतो ही गोष्ट १२ सप्टेंबर १९५७ रोजी अमेरिकेतल्या जेम्स व्हिकारी या मार्केट संशोधकानं मांडली. त्यानं सिनेमा चालू असताना प्रेक्षक गिऱ्हाईकांना विशिष्ट जाहिराती फक्त ३० मायक्रो सेकंदच दाखवल्या. ‘पॉपकॉर्न खा’, ‘कोला प्या’ असा संदेश प्रेक्षकांनी पाहिला. त्यानंतर मध्यंतरात कोकाकोलाची विक्री १८ टक्क्य़ांनी तर पॉपकॉनची तब्बल ५८ टक्क्य़ांनी वाढली.
अमेरिकेतल्या जाहिरात व्यवसायात खळबळ उडाली पण त्यापेक्षा मोठा वाद झाला तो प्रेक्षकाचा ग्राहक म्हणून ‘वापर झाला’ यावर!  पण प्रेक्षकांना आपण त्या ३० मायक्रांसेकंदाच्या जाहिराती पाहिल्याचं आठवतच नव्हतं!
या प्रयोगाने एका नव्याच जाहिराततंत्राला जन्म दिला. त्याचं नाव होतं ‘सबलिमिनल’ प्रचार. आपण एखादा संदेश वाचण्यापूर्वी डोळ्यासमोरून नाहीसा झाला तरी त्या संदेशाची प्रतिमा आपल्या अबोध मनावर उमटते. असे संदेश आपल्या नकळत अनेक वेळा दिले तर मनाच्या अबोध पातळीवर ती गोष्ट कायमची कोरली जाऊ शकते आणि प्रत्यक्षात आपण आपल्या नकळत कोरलेल्या संदेशावर हुकूमाप्रमाणे वागतो.
आपलं मन आपली जहागिरी असते, यावर कोणीही दावा सांगू शकत नाही. अशी ठाम आरोळी ग्राहक-प्रेक्षक मंचानं ठोकली. ‘सबलिमिनल’ जाहिरातीवरील संशोधन आणि वापरावर बंदी ठोकली.
याच गदारोळात ‘जेम्स व्हिकारी’ या संशोधकानं नवा बॉम्ब टाकला.. आपण खोटे आकडे दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचं जाहीर केलं. या धमाल संशोधनावर बसलेली धूळ २००० साली जॉर्ज बुशच्या अध्यक्षीय निवडणुकीत कॅम्पेन मॅनेजरांनी उडवली. सुदैवानं, अल गोरच्या पाठीराख्यांनी बुशसाहेबांची चालाखी ओळखली आणि ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणली! ‘सबलिमिनल’ जाहिरात तंत्राने पुन्हा डुबकी मारली. परंतु मानसशास्त्रज्ञांना या तंत्राविषयी अफाट उत्सुकता वाटत होती. त्याना अशाप्रकारच्या नकळत दिलेल्या संदेशामधून मद्यपान आणि अमली पदार्थाच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देता येतं का? यावर संशोधन करायचं होतं. या संशोधनानं पुन्हा २०११ ला उचल खाल्ली आहे. प्रायोगिक तत्त्वावरील संशोधनाला सुरुवात झाली. गंमत म्हणजे या नव्या संशोधनानुसार जेम्स विकारीने केलेला दावा फारसा खोटा नव्हता, असं सिद्ध होतंय! उदा. सिनेमा पाहाताना तहान लागली असल्यास ‘कोला प्या’ हा संदेश मनावर उमटतो. सिनेमा रंजक आणि मजेदार असेल तर हा संदेश अधिक प्रभावीपणे कोरला जातो असं ही आढळलं.
आता, असे सबलिमिनल संदेश ऑडिओ माध्यमातूनही देता येतात असं सिद्ध झालंय. शॉपिंग मॉलमधल्या संगीतामधून असे संदेश दिले तर तो विशिष्ठ माल विशेष खपतो, असं म्हणतात..
 मनावरचं असं संशोधन वाचणं रंजक आणि उद्बोधक. आता मॉलवर फिरताना कानात बोळे घालून हवं ते, हवं तितकंच घ्या!!

डॉ.राजेंद्र बर्वे  drrajendrabarve@gmail.com