विद्युतवाहकातून वीजप्रवाहाची वाहतूक कशी होते यासंबंधी प्रयोग करून त्याच्या मोजमापाचे नियम मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजे गेओर्क झिमोन ओहम. ते भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ज्ञ होते. ओहम यांचा जन्म जर्मनीतील बव्हेरियामधील एरलांगेन येथे झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांतील उच्च पातळीचे शिक्षण दिले. नंतर त्यांना स्वित्र्झलडला पाठविले. तिथल्या शाळेत त्यांनी गणित शिक्षकाची नोकरी धरली. शिवाय गणिताचा खासगीत अभ्यास केला. १८११ साली ते एरलांगेन विद्यापीठात परतले व डॉक्टरेट पदवी संपादन केली. गणिताचे प्राध्यापक म्हणून तेथेच काम करू लागले. बव्हेरियन सरकारतर्फे १८१३ मध्ये बामबेर्क येथील शाळेत भौतिकशास्त्र व गणित शिकवू लागले. कलोन येथील जेझुंइट्स कॉलेजातही (१८१७-२६) ओहमनी दोन्ही विषय शिकवले. तेथील प्रयोगशाळा चांगली होती म्हणून ओहमनी भौतिकशास्त्रातील प्रयोग करण्यास सुरुवात केली. ओहमच्या नियमाचा महत्त्वपूर्ण भाग ज्यात सारांशरूपाने दिला आहे असे - गणितीयदृष्टय़ा अनुसंधानित केलेले ‘गॅल्व्हानिक विद्युतमंडल’ या अर्थाचे शीर्षक असलेले पुस्तक १८२७ साली प्रसिद्ध झाले. त्यांच्या कॉलेजने व संशोधकांनी या कार्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ओहमनी कॉलेजचा राजीनामा दिला. बव्हेरियाच्या राजाने ओहम यांची योग्यता जाणून त्यांना न्युरेनबर्ग येथील पॉलिटेक्निक स्कूलमध्ये प्राध्यापकाची जागा देऊन त्यांचा सन्मान केला. १८४९ साली म्युनिक विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. विद्युतपरिपथामधील विद्युतप्रवाह, वाहकाच्या दोन टोकांमधील विद्युतविभवांतर व वाहकात होणारा विद्युतविरोध यांच्यातील परस्परसंबंध ओहमच्या नियमामुळे समजले. याशिवाय द्रवपदार्थाची विद्युतसंवाहकता, ध्वनीविज्ञान व प्रकाशकी या विज्ञानशाखेतही ओहम यांनी संशोधन केले. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन अखेरीस लंडनच्या रॉयल सोसायटीने १८४१ साली ओहमना कॉप्ली पदक दिले. तसेच १८४२ मध्ये त्यांना सोसायटीचे परदेशी सदस्यत्वही दिले. ओहम यांनी रोध आणि रोधकता याबाबत केलेल्या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल विद्युतरोध मोजण्याच्या एककाला ओहम हे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. - डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org ‘साहित्य हे जीवनाचे वास्तव!’ २००५ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात कुँवर नारायण यांनी साहित्यविषयक काही विचार मांडले, ते थोडक्यात जाणून घेऊ या. ते म्हणतात- ‘‘ज्ञानपीठ पुरस्काराने माझा सन्मान केल्याबद्दल मी भारतीय ज्ञानपीठाला धन्यवाद देतो. पुरस्कारांना मी कायमच एक प्रकारे सामाजिक ऋण मानतो, कारण त्यामुळे मी लेखनासाठी प्रवृत्त होतो. हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होत आहे आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ते पोहोचत आहे. भारतीय संत, कवींचे जीवन आणि रचनाकृतींकडे बघितल्यावर जाणवते, की त्यांनी राजदरबारापासून दूर राहून साहित्य आणि संगीताला समृद्ध केले आहे आणि या गोष्टी केवळ सत्ता मिळविण्यासाठी नाहीत- हे मानणं ही एक महान नैतिक क्रांती होती आणि याचा विलक्षण प्रभाव भारतीय जनमानसावर पडलेला आहे. जीवन आणि शब्दाच्या घनिष्ठ संबंधाबद्दल नीटपणे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शब्द कधी मरत नाहीत, म्हणूनच तर त्यांना ‘अ-क्षर’ म्हटलं जातं. चुकीच्या जाणिवेमुळे शब्दाचा अर्थ निस्तेज होतो. साहित्यामुळे काळानुरूप सिद्ध जीवनमूल्यांचं संरक्षण होतं आणि भाषेमध्ये स्थैर्य पण राहतं. अभिजात साहित्यातील स्थैर्य आणि त्यातील माणसाच्या आत्मबलासारख्या अपराजेय जीवनशक्तीने मला सर्वाधिक आकृष्ट केले आहे. कला आणि साहित्याच्या वैश्विक परिघात मानवतेचं दर्शन घडतं. कविता हेच माझे विश्व आहे. तिच्यामध्ये सर्वाच्या सुख-दु:खाला पुरेसे स्थान असायला हवं, इतका तिचा परीघ मोठा ठेवण्याची माझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीने साहित्य ही बुद्धीची किमया नसून, ते जीवनाचं मोठ्ठं यथार्थ वास्तव आहे आणि आश्चर्य पण आहे. या विचारांमुळे लेखनासाठी मला आत्मविश्वास मिळाला आहे. माझ्या या साहित्यविश्वाला मी समृद्ध आणि विकसित करणार आहे, पण ती आक्रमक फौजीप्रमाणे नाही तर अडीच अक्षरांच्या ‘प्रेमा’च्या बळावर करणार आहे. काळानुरूप माझ्या भाषेत बदल घडत आले आहेत. कविता आणि कला आपल्या रचनाशील मनाचे, जीवनाचे अविभाज्य अंग आहेत; जे भोवतीच्या साऱ्या विसंगत आणि विषमतापूर्ण वातावरणातही जीवनाप्रति आस्था, प्रेम जागे ठेवते.’’ - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com