भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००६चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना प्रदान करण्यात आला. कोकणी भाषेला प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला असून, हा पुरस्कार संस्कृत भाषेतील प्रतिभावंत कवी, विद्वान पंडित डॉ. सत्यव्रत शास्त्री यांच्याबरोबर विभागून मिळाला आहे. साहित्याचा भक्कम वैचारिक पाया असलेले ते एक प्रतिभावंत लेखक आहेत. नवीन विचारांना दिशा दाखविणारे दीपस्तंभ असे रवींद्रबाबा केळेकर यांचे वर्णन इतर गोमंतकीय साहित्यिक करतात. पोर्तुगीज, गुजराती, हिन्दी, मराठी, कोकणी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पण लिहायचं ते फक्त कोकणीतच व कोकणीकरिताच, अशी भूमिका असलेल्या या झुंजार लेखकाला ‘लेखक’ म्हटलेले आवडत नाही. मग ते म्हणायचे, ‘मी रायटर नाही. फायटर आहे.’ रवींद्रबाबांचा जन्म ७ मार्च १९२५ रोजी कंकोलिम (गोवा) येथे झाला. त्यांचे वडील डॉ. राजारामबाबा केळेकर हे डॉक्टर होते. गुजरातेतील ‘दीव’ येथे ते प्रॅक्टिस करत असल्याने, तेथे वास्तव्य असल्याने रवींद्रबाबांचे बालपण, प्राथमिक शिक्षण गुजराती भागात गेले. पण महाविद्यालयीन शिक्षण गोव्याच्या अल्मेडा कॉलेजात झाले. विवेकानंद, सावरकर, काकासाहेब कालेलकर, मामा वरेरकरांचे साहित्य त्यांनी वाचले. र. धों. कर्वे यांच्या सहवासात अनेक इंग्रजी लेखकांची पुस्तके वाचली. . सालाझारच्या अत्याचाराविरोधातील गोव्यातील स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अखंड वाचन, लेखन ही केळेकरांची शक्ती आणि वाचलेल्या ग्रंथांबद्दल मित्रपरिवारामध्ये भरभरून बोलणे हा त्यांचा छंद. साहित्य, संस्कृती, इतिहास, विज्ञान, समाजशास्त्र हे त्यांचे आस्थेचे विषय. प्रतिभेला निरीक्षणाचा, व्यासंगाचा चारा सतत घालत राहिला पाहिजे. कारण कविता जर भाषेचा प्राण आहे तर गद्य हे शरीर आहे, असे त्यांचे मत होते. विषयाचे खोलवर चिंतन पूर्ण झाल्याखेरीज त्यांनी कधी लिहिले नाही. सुटसुटीत साधी, सरळ, सोपी रचना हे त्यांच्या वैशिष्टय़. ‘जाग’ हे कोकणी मासिकही त्यांनी चालविले. मराठीतही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध असली तरी कोकणीत अधिक आहेत. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com सवतीमत्सर ‘बहरला पारिजात दारी / फुले का पडती शेजारी?’ आपल्या पतीनंच नव्हे तर ज्याची प्रेमानं निगराणी केली त्या प्राजक्तानंही सवतीवरच आपली पुष्पशोभा उधळावी, हे पाहून सत्यभामेला रुक्मिणीचा मत्सर वाटला तर नवल ते काय? मत्सराचा चंचुप्रवेश पती-पत्नीमध्ये ‘वह’ आला किंवा आली की होतो. म्हणूनच वैज्ञानिक मत्सरासाठी रोमॅन्टिक जेलसी असा शब्द वापरतात. त्याचं मोजमाप करण्याचे प्रयत्न मुख्यत्वे सुसान फायफ्परनी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मत्सराच्या तीन अवस्थांची कल्पना केली. पहिली पायरी आकलनात्मक मत्सराची. म्हणजे मत्सर वाटतो, पण तो मनातल्या मनातच ठेवला जातो. दुसरी पायरी भावनिक म्हणजे आता मत्सर भावनाविष्काराच्या रूपात प्रकट होतो. आणि तिसऱ्या पायरीवर त्याचं वागणुकीत प्रतिबिंब उमटतं. या तिन्ही पायऱ्यांच्या तीव्रतेचं मोजमाप करण्यासाठी त्यांनी प्रत्येकी आठप्रमाणे प्रश्नांची यादी तयार केली आहे. समजा, की तुमची ‘क्ष’मध्ये रोमॅन्टिक गुंतवणूक झाली आहे. तर मग आकलनात्मक मत्सरासाठी ‘क्ष’ हा दुसऱ्या कोणाकडे आकर्षति झाल्याचा किंवा दुसरी/दुसरा कोणी ‘क्ष’कडे आकर्षति झाल्याचा संशय तुम्हाला येतो का, असा सवाल केला जातो. त्यावर कधीही नाही, अशा उत्तराला एक गुण तर नेहमीच या उत्तराला सात गुण अशी मोजपट्टी तयार झाली. भावनिक मत्सराचं विश्लेषण करताना ‘क्ष’ हा त्या तिसऱ्याच व्यक्तीचं समरसून गुणगान करतो. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, या प्रश्नावर आनंद होतो या उत्तराला एक तर अंगाची लाहीलाही होते याला सात गुण दिले जातात. आणि वर्तणूकविषयक मत्सराच्या परीक्षेसाठी तुम्ही ‘क्ष’चं कपाट, बॅग, मोबाइल फोन यांची किती वेळा तपासणी करता किंवा सरळ सरळ त्यालाच िखडीत गाठून त्याचीच झाडाझडती किती वेळा घेता, अशा प्रश्नांना मिळालेल्या ‘कधीही नाही’ या उत्तराला एक तर ‘सतत’ या उत्तराला सात असे गुण दिले जातात. अशा प्रकारे सर्व प्रश्नांना मिळालेल्या प्रतिसादांच्या गुणांची बेरीज करून मानसोपचारतज्ज्ञ मत्सरानं कोणती पातळी गाठलेली आहे, याचं निदान करतात. अर्थात अशा टोकाच्या भूमिका क्वचितच पाहायला मिळतात. बहुतेक जण अध्येमध्ये कुठंतरी लटकलेले असतात. आपल्याला बुवा कोणाचाही किंवा कशाचाही मत्सर वाटत नाही, असं सांगणाऱ्या महाभागांनाही या परीक्षेला तोंड द्यायला लावायला हवं. -डॉ. बाळ फोंडके मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org