पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठय़ांच्या दृष्टीने खलनायक ठरलेल्या दोन व्यक्तींपैकी नजीब खान ऊर्फ नजीब उद् दौला हा एक रोहिला पठाण होता. १७४७ साली नजीब चुलत्याच्या बोलावण्यावरून भारतात कटेहर येथे येऊन अली महंमदाच्या सन्यात एका पथकाचा जमादार झाला. अली महंमदाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अल्पवयीन म्हणून दुंदेखान हा जहागिरीचा कारभार पाहू लागला. नजीब खानाची बायको मृत्यू पावल्यानंतर त्याने दुंदेखानाच्या मुलीशी दुसरा विवाह लावला. या विवाहात दुंदेखानाने त्याला चंदपूर, पिंजोर, थेरकोट कोरादाबाद हे परगणे जहागिरीत दिले. लिहिता वाचता न येणारा नजीब खान धाडस, कपट, कारस्थाने, प्रसंगावधान, मुत्सद्देगिरी या निसर्गदत्त गुणांमुळे अल्पावधीत मोगल बादशाहाचा प्रमुख उमराव बनला. अफगाण सम्राट अहमदशाह अब्दाली याच्याबरोबर नजीब संबंध ठेवून होता. दिल्लीतली बित्तंबातमी अब्दालीला पोहचवण्याचे काम नजीब करीत असे. १७५६-५७ साली अब्दालीने हल्ला करून दिल्ली लुटली, तत्कालीन बादशाह अलमगीर द्वितीयला अटक केली. नजीब खानाने काही खंडणी देण्याचे कबूल केल्यावर अब्दालीने अलमगीरला नामधारी बादशाह नियुक्त करून नजीबला मीरबक्षी म्हणजे कारभारी नियुक्त केले. विश्वासघातकी नजीबच्या कारभाराने सावध होऊन बादशाहा आणि वजीर इमाद उलमुल्कने मराठय़ांचे साहाय्य मागितले. मराठय़ांच्या ३०००० च्या फौजेने नजीबच्या सन्यावर हल्ला करून त्याला पराभूत केले. नजीबने दिल्ली सोडून जाण्याचे आणि खंडणी देण्याचे कबूल केल्यावर त्याची सुटका करून मराठय़ांनी बादशाहाला परत दिल्लीच्या तख्तावर बसवले. झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नजीबने काही सन्य गोळा करून आपल्या गेलेल्या मीरत परगण्यावर कब्जा करून अब्दालीला पुन्हा एकदा मराठय़ांशी लढून दिल्ली घेण्यासाठी पाचारण केलं. यावेळी १७६१ साली पानिपत येथे मराठय़ांशी झालेल्या युद्धात पराभूत करून मराठा साम्राज्याची मोठी हानी करण्याच्या कामात अब्दालीपेक्षा नजीबची मुत्सद्देगिरी, कारस्थाने अधिक कारणीभूत ठरली. अतिशय चोख प्रशासक असूनही नजीब खान त्याच्या कपटी कारवायांमुळे इतिहासात कुख्यात झाला. sunitpotnis@rediffmail.com