श्रुती पानसे contact@shrutipanse.com

कितीही ठरवलं तरी आपण कायमस्वरूपी आपोआप आनंदात राहू शकत नाही. मुलांचं असं नसतं. लहान असेपर्यंत ती कायमच आनंदात असतात, मजेत असतात, कसलीही चिंता नसते. किंवा चिंता असली तरी हसत राहणं हा त्यांचा गुणधर्म असतो. आनंदी असणं चांगलं असतं. आनंदी असण्यासाठी आपल्या शरीरात चार प्रकारची रसायनं निर्माण होत असतात. कोणी कौतुक करणं, बक्षीस मिळणं – यामुळे डोपामाइन, व्यायाम करून झाल्यावर शरीरामध्ये चांगली भावना निर्माण होते. तेव्हा निर्माण होतं सेरोटोनिन. प्रेम आणि विश्वास यामुळे ऑक्सीटोसिन निर्माण होतं. तर एखाद्या वेदनेपासून किंवा दु:खापासून मुक्ती मिळते तेव्हा एन्डॉपर्फिन निर्माण होतं. मनाजोगता पदार्थ खायला मिळाला कीसुद्धा एन्डॉर्फिनच हजर होतं. या सर्व रसायनांच्या कामकाजावर अद्याप मोठय़ा प्रमाणावर संशोधन चाललेलं आहे.

आपल्याला विविध कृतींमुळे आनंद होतो. आपल्या लेखी त्या आनंदाची व्याख्या बरीचशी एकसारखीच असली तरी मेंदूमध्ये त्यासाठी चार रसायनांची योजना केलेली आहे. मग माणूस पुरेसा आनंदी का नाही?  हे खरंय की लहान मुलांसारखी मोठी माणसं सदैव आनंदी राहू शकत नाहीत. पण काही चांगली कामं करून आनंद मिळवता नक्की येईल. यासाठी काय करायचं हे या रसायनांनीच सांगितलेलं आहे. मजा केल्यामुळे मिळालेला आनंद आणि दु:खावर, ताणावर, अस्वस्थतेवर उत्तर मिळालं म्हणून  होणारा आनंद, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. उदा. आवडीचं आइस्क्रीम मिळाल्यावर होणारा आनंद. एखाद्या कोर्ट केसमधून सुटका झाल्यावर मिळणारा आनंद, घाम गाळत एखादं अवघड आव्हान पूर्ण केल्यावरचा आनंद आणि एखाद्या दिवशी काही न करता फक्त वेळ घालवला,  या आनंदाच्या छटा वेगळ्या असतात.  दु:ख आणि ताण यावर मात करून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.

दुसरं आणि महत्त्वाचं असं की, अमुक झालं की मी खूप समाधानी होईन. हे मिळालं की माझ्यासारखी सुखी मीच! असा आनंद सारखा लांबणीवर टाकण्याची गरज नाही. आनंदाची कारणं शोधायची आणि करायची. आपल्याच तर मेंदूत- आपल्या अगदी जवळ याची रसायनं आहेत.