मातीचा नमुना हा शेतातील जमिनीचा प्रातिनिधिक नमुना असावा. त्यामुळे नांगरणीपूर्वी वेगवेगळ्या प्राकृतिक गुणधर्माकरिता नमुने घ्यावेत. मात्र रासायनिक खते दिल्यास २-३ महिने नमुना घेऊ नये. तसेच काडीकचरा, शेणखत जमा असलेली, झाडाजवळील आणि जनावरे बसण्याची जागा टाळावी. नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडीकचरा साफ करून कुदळ किंवा फावडय़ाने प्रत्येक ठिकाणी ‘व्ही’ आकाराचा ३० सेमी खोलीचा खड्डा खोदावा. खड्डय़ातील प्रत्येक बाजूची माती (२ ते ३ सेंमी जाडीची) वरपासून खालपर्यंत खुरपीने काढावी. शेतजमिनीतील सगळ्या ठिकाणचे आठ-दहा नमुने घेऊन ती माती घमेल्यात टाकावी व एकत्र मिसळून गोणपाट किंवा स्वच्छ कापडावर चौकोनी किंवा वर्तुळाकार पद्धतीने पसरावी. माती ओलसर असल्यास सावलीत वाळवावी. या संग्रहाचे समान चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढावेत आणि उरलेले दोन भाग एकत्र करावेत. जोपर्यंत अर्धा-एक किलो माती शिल्लक राहत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया करून ही माती कापडी पिशवीत भरावी. रासायनिक खताच्या पिशव्या नमुन्यासाठी वापरू नयेत. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या तपासणीसाठी लोखंडी हत्यारे वापरू नयेत. नमुना पाठविताना पुढील माहिती द्यावी. शेतकऱ्याचे नाव, पूर्ण पत्ता, शेतीचा सव्र्हे नंबर किंवा गट नंबर, बागायती/कोरडवाहू, जमिनीचा प्रकार, मागील हंगामात घेतलेले आणि पुढील हंगामात घेणारे पीक, वापरलेली खते आणि अपेक्षित उत्पादन.सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था मातीची तपासणी करतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी कृषीखात्यातर्फे तसेच काही ठिकाणी राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टलिायझर्स यांच्यातर्फे यासाठी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. अलीकडे फिरत्या प्रयोगशाळेतूनही मातीपरीक्षण होते.शेतातील जमिनीतून पिकाला कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात मिळत आहेत, ही माहिती मिळवणे हा माती परीक्षणाचा मुख्य उद्देश असतो. यावरून पिकाला आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण तसेच खतांची मात्रा ठरविता येते. यांमध्ये तीन मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश), चार दुय्यम मूलद्रव्ये (गंधक, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम) आणि १३ सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश आहे. तसेच जमिनीची आम्लता-विम्लता, क्षाराचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब आणि विद्युत वाहकता यांबद्दलची माहिती मिळते.- डॉ. रू. तु. गहूकर (नागपूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.orgजे देखे रवी..: हलचल१९७१ साली मी अमेरिकेत पोहोचल्यावर पहिल्यांदा जाणवली ती सांस्कृतिक बंडखोरी. तरुणांच्या अस्वस्थतेचे रूपांतर ज्याला हिप्पी म्हणतात त्या प्रकारच्या वागण्यात झाले होते. ज्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात हा रोष होता त्यांच्या श्रमामुळे निर्माण झालेल्या सुबत्तेची खरे तर ही अपत्ये होती. प्रामुख्याने गौरवर्णीय होती आणि ज्या पूर्वजांनी उदारमतवाद आणि वैचारिक स्वातंत्र्य बहाल केले होते, त्यांच्याच विरुद्ध ही उभी ठाकली. आईबापांच्या पैशावर त्यांची ही स्वैर हिप्पीगिरी चालली होती. कामाच्या नावाने यांची किंमत शून्य होती. लैंगिक स्वैराचार, मादक द्रव्ये आणि बेजबाबदारपणा ही यांची वैशिष्टय़े. परंतु या सगळ्याच्या मागे दुरान्वयाने अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि मुख्यत: व्हिएतनाममध्ये चालू असलेले युद्ध यांचा संबंध होता. युद्धासाठी सैनिक भरती जवळजवळ सक्तीची होती. तरुणांना तीन हजार मैलांवरच्या युद्धात रस नव्हता. अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेला दूरवर अंकित देशांची गरज होती. त्यातूनच लष्कर आणि भांडवलदार यांच्या संगनमताने हे युद्ध आमच्यावर लादले असा या तरुण मंडळींचा ग्रह होता. म्हणूनच पुरुषांनी लांब केस वाढवणे, कानात डूल घालणे, अभिजात संगीताऐवजी ज्याला स्वैर वन्य आणि भडक म्हणता येईल अशा तऱ्हेने शिरा ताणत गाणे असली चिन्हे वापरून प्रस्थापितांवरचा राग दाखवणे सुरू झाले. व्हिएतनाम युद्ध अमेरिकेला मोठे जड जात होते. दररोज येणाऱ्या विमानातून सैनिकांची प्रेते परत येत. त्यांचे आईवडील शोक करत असल्याची दृश्ये टीव्हीवर दाखवत. त्यातच काळ्या लोकांच्या परिस्थितीत फरक पडत नव्हता तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी अनेक निदर्शने झाली आणि ती शमवण्यासाठी शिकागोत बळाचा वापर पोलिसांना करावा लागला आणि अनेक डोकी फुटली. हे अमेरिकन लोकांच्या इतिहासात नवीनच होते. ७१ साली आणखी एक भानगड उद्भवली. बंगलादेश युद्ध झाले त्यात निक्सन-किसिंजर या अमेरिकन दुकलीने पाकिस्तानची बाजू घेतली. बांगलादेशातल्या अत्याचाराच्या बातम्या झळकू लागल्या तेव्हा अमेरिकेतल्या एकूण सर्व प्रकारच्या कलाकारांनी ज्यांचा समाजात मोठा प्रभाव होता त्यांनी पाकिस्तानला प्रखर विरोध करत न्यूयॉर्कमध्ये एक मोठा खरोखरच न भूतो न भविष्यति असा जलसा केला आणि अमेरिकेतल्या सत्ताधाऱ्यांना एक हादरा दिला. बांगलादेश मुक्तीनंतर वातावरण थोडेफार निवळले. निक्सन परत निवडून येणार हे स्पष्ट असूनही निक्सनच्या अति उत्साही पित्त्यांनी वॉशिंग्टनमधल्या वॉटरगेट हॉलमध्ये असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयावर रात्री त्या पक्षाचे गुप्त दस्तऐवज मिळवण्यासाठी गुपचूप दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते पित्ते पकडले गेले. ही घटना फार दूरगामी परिणाम करणारी ठरली. हे घडत असताना मी अमेरिकेत होतो.- रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.comवॉर अँड पीस : रक्तदाब : आयुर्वेदीय विचारआयुर्वेदीय थोर ग्रंथांत रक्तदाबवृद्धी वा रक्तदाबक्षय असा शब्दप्रयोग कुठेच नाही. काही थोर वैद्य लोक ‘रक्त चाप’ असा पर्यायी शब्द वापरतात. प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाला त्याच्या चिकित्सालयात विविध वातविकार, प्राणवह स्रोतसाचे विकार, मधुमेह या तक्रारींबरोबरच ‘ब्लडप्रेशर’ या समस्येचाही सामना करायलाच लागतो. ‘तुम्हाला ब्लडप्रेशर आहे’ असे वैद्यकीय चिकित्सकाने सांगितल्याबरोबर ब्लडप्रेशरची गोळी जी सुरू होते, ‘ती’ कधीही संपतच नाही. अशी सामान्यपणे या रोगाची स्टोरी आहे.रक्तदाब हा विकार आहे का लक्षण आहे का अवस्था आहे याची सामान्य रुग्णाला बिलकूल फिकीर नसते. त्याला रक्तदाबवृद्धी किंवा क्षय, यामुळे ब्लडप्रेशर वाढणे किंवा एकदम कमी होणे यामुळे त्रास होत असतो. याचा त्रास कमी करणे ‘एतद् वैद्यस्य वैद्यत्वं,’ वैद्यांचे कर्तव्य आहे. घटपटादि चर्चा, मान्य ग्रंथांचे आधार देणे-घेणे, रोगाला नाव ठेवणे ही सर्व फावल्या वेळातील तात्त्विक चर्चा झाली!रक्तदाबवृद्धी व क्षय या दोन्ही भिन्न अवस्था आहेत. त्यांची कारणपरंपरा, लक्षणसमुच्चय, रोगप्रवास, उपशय, अनुपशय व उपचार भिन्न आहेत. पथ्यपाणी भिन्न आहे. रोग समजण्यात नेमकेपणा असल्यास औषधयोजकता अवघड नाही. ब्लडप्रेशरसह अन्य लक्षणसमुच्चय, अवस्था समजून घेण्याकरिता मनुष्यस्वभाव, त्याचा आहारविहार, राहणी, परिसर हे सर्व समजून घ्यावयास हवे. ब्लडप्रेशर हा स्वतंत्र विकार शंभरात एखाद्यालाच असतो. सर्वसामान्यपणे मधुमेह, स्थौल्य, हृद्रोग, नेत्ररोग, मूत्रपिंड विकार, धाप लागणे, हातापायांवर सूज येणे, मुंग्या येणे, जीव घाबरा होणे, तोल जाणे, बोलता बोलता तोंड वाकडे होणे अशा विविध लक्षणांकरिता रक्तदाब तपासणी ही अत्यावश्यक असते. सामान्यपणे सायंकाळी रक्तदाब तपासणे; अधिक योग्य ठरते. त्या वेळेस नाडीचे ठोके, श्वसनाचा वेग, रुग्णाचे वजन यांची नोंद अवश्य करावी. ज्यांच्या पोटाच्या व लघवीच्या तक्रारी आहेत त्यांच्याकरिता रिकाम्या पोटी रक्तदाब परीक्षण करावे.- वैद्य प. य. वैद्य खडीवालेआजचे महाराष्ट्रसारस्वत : २ मे१९०० > ‘महाराष्ट्राचा इतिहास’ (सन १३०० ते १७०७) आणि ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र’ लिहिणारे लक्ष्मण कृष्ण चिपळूकर यांचे निधन. विष्णुशास्त्रींचे ते धाकटे बंधू. १९२९ > ‘मराठी काव्याची उत्क्रांती व केशवसुत’, ‘प्राचीन मराठी कवी’, ‘काव्यविवेचन’ हे ग्रंथ लिहिणारे आणि ग्रंथसंपादक म्हणून ज्ञानेश्वरी, मोरोपंतांच्या स्फुटरचना तसेच मोरोपंतकृत महाभारत, वामनपंडितांचे चरित्र आदींच्या प्रती तयार करणारे व्यासंगी काव्यसमीक्षक बाळकृष्ण अनंत भिडे यांचे निधन. ते स्वतदेखील कवी होते. ‘प्रभुसदन’ व ‘फुलांचे झेले’ हे त्यांचे काव्यसंग्रह होत. १९९५ > ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले’ हा प्रभातच्या तुकाराम चित्रपटातील अभंग लिहिणारे कवी, गीतकार व पराविद्येचे अभ्यासक शांताराम गोविंद आठवले यांचे निधन. ‘एकले बीज’, ‘बीजांकुर’, ‘चंदेरी लहरी’, ‘सुमन-फळे’ हे काव्यसंग्रह, ‘शान्ताचिया घरा’ आणि ‘साधा विषय मोठा आशय’ (ललितलेख)‘ॐकार रहस्य’ आणि ‘ज्ञानदेवीची आराधना’ तसेच ‘‘प्रभात’काळ’ हा प्रभात फिल्म कंपनीत असताना पाहिलेली माणसे आणि चित्रपटांची घडण यांविषयीचा लेखसंग्रह, ही त्यांची ग्रंथसंपदा.- संजय वझरेकर