भारतात पहिली आगगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई-ठाणे दरम्यान धावली आणि त्यानंतर देशभर रेल्वेचे जाळे पसरत गेले. अर्थातच ब्रिटिश राज्यकर्त्यांनी असे रेल्वेमार्ग विकसित करताना प्रामुख्याने त्यांच्या व्यापार आणि वसाहतवादाला पोषक धोरण अवलंबविले. त्यानुसार चार प्रकारचे लोहमार्ग टाकले गेले. त्यांचे परिमाण ‘गेज’ या एककात संबोधतात. ‘गेज’ हे दोन समांतर रुळांतील आतल्या बाजूंमधील अंतरावरून ठरवलेले असते. उदाहरणार्थ, ब्रॉडगेज – १.६७६ मीटर, मीटरगेज – १.००० मीटर, नॅरोगेज -०.७६२ मीटर, आणि लिफ्टगेज – ०.६१० मीटर.

भौगोलिक स्थिती, प्रवासी-मालवाहतुकीची रहदारी आणि जोडली जाणारी स्थाने यांच्या महत्त्वावरून लोहमार्ग कुठल्या गेजचा असावा, हे त्या काळी ठरवले गेले. उदाहरणार्थ, ब्रॉडगेज लोहमार्ग हा मुख्य नगरे व बंदरे जोडणे किंवा कच्चा माल वा उत्पादन ने-आण करण्यासाठी टाकला गेला. (मुंबई-कोलकता). दुय्यम दर्जाच्या वाहतुकीसाठी मीटर गेज (अहमदाबाद-दिल्ली), तर डोंगराळ किंवा कमी वस्ती असलेल्या भागासाठी नॅरो गेज लोहमार्ग टाकले गेले. (नेरळ-माथेरान). खाणक्षेत्रासाठी बहुधा लिफ्ट गेज वापरला गेला.मोठय़ा गेजवर मोठय़ा क्षमतेचे इंजिन, प्रवासी डबे आणि माल-वाघिणी वापरणे शक्य होते. तसेच रेल्वेगाडीचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त ठेवणेदेखील सुरक्षित असते. मात्र वरील चारपकी सर्वाधिक स्थर्य असलेल्या ब्रॉडगेज लोहमार्गाला वळणासाठी मोठी त्रिज्या आणि त्याच्या आजूबाजूला बरीच जागा सोडावी लागते. उतरत्या तुलनेत मीटरगेज, नॅरोगेज आणि लिफ्टगेज लोहमार्ग सर्व बाबतीत कमी क्षमतेचे होत जातात;  पण जागेची बचत आणि लहान त्रिज्येत वळसा घालत रेल्वेगाडीस वर चढण्यास उपयुक्त ठरतात.  रेल्वे-जाळ्यात गेज विविधता असल्यास वाहतूक खंडितपणे करावी लागते, ज्याने वेळेचा अपव्यय होतो. म्हणूनच भारतीय रेल्वेने अधिकाधिक लोहमार्ग ब्रॉड गेजमध्ये परिवíतत करण्याचा कार्यक्रम १९९१ पासून राबविला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे वाहतूक एकजिनसी चालण्यास त्यामुळे मोठी मदत झाली आहे.

तथापि, जगभर मोठय़ा शहरांत मेट्रो-रेल्वेसाठी स्टँडर्ड किंवा स्टीव्हन्सन गेज लोहमार्ग (१.४३५ मीटर) वापरतात. त्यासाठीचे रेल्वे डबे सहज उपलब्ध असल्याने आपणही तोच मार्ग स्वीकारला आहे. सर्वात प्रथम प्रवासी आगगाडी चालवणाऱ्या स्टीव्हन्सनने तो गेज प्रचलित केला.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

पोट्टेकाट्ट यांचे भाषण

‘‘आपला देश राजनीतिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या काळातून पुढे जात असताना मी वर्ष १९८० सालचा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतो आहे. मी ही गोष्ट मुद्दाम अशासाठी सांगतो आहे की, कला, साहित्य आणि संस्कृती यासंबंधातील आजच्या पिढीची धारणा ही मागच्या पिढीपेक्षा अगदी वेगळी आहे. या धारणांबरोबरच अनेक मूल्येही बदललेली आहेत. काही लोक तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जबरदस्त प्रगतीमुळे या युगात साहित्यिकांचे स्थान आहेच कुठे? असाही प्रश्न विचारू लागलेले आहेत; पण गंभीरपणे आपण विचार केला तर असे लक्षात येते की, परिवर्तन आपल्या आतील राक्षसी प्रवृत्तीलाच खतपाणी घालले आहे. अशा परिस्थितीत केवळ कला आणि साहित्य याच गोष्टी मानवी समाजाचे रक्षण करणार आहेत. मनुष्याच्या आतील पशुभाव नष्ट होण्याची प्रेरणा खऱ्या साहित्याने द्यायला हवी.

माझ्या मल्याळम् भाषेत अनेक साहित्य प्रकार आहेत. मल्याळम् साहित्य अनेक नवीन आणि जिवंत प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेत, पुढे पुढे जात राहिलेलं आहे. भारतीय भाषांतील साहित्य संपूर्ण देशात पसरलेलं आहे; पण एका प्रदेशातील सांस्कृतिक आणि साहित्यिक परिस्थिती अन्य प्रदेशांतील लोक समजू शकत नाहीत. आम्ही अमेरिका, रशिया, स्वीडन इ. देशांतील साहित्यिकांविषयी जाणतो; पण आपल्या शेजारच्या प्रदेशातील कवी, कथाकार यांच्यासंबंधी आम्ही जवळजवळ अनभिज्ञ असतो. ही एक दयनीय अवस्था आहे.साहित्याचा उद्देश मनाला जागृत करणं आणि त्याच्या अंतरात्म्याला वर उचलणं हाच आहे. त्याचबरोबर भारतातील विभिन्न प्रदेशांतील लोकांना समता, सहयोग आणि पारंपरिक, सांस्कृतिक समन्वय याद्वारे, एकमेकांजवळ आणणं- हाच साहित्याचा उद्देश आहे; परंतु आज ते प्रेम आणि समतेची भावना प्राचीन काळातील वस्तूंप्रमाणे जुनीपुराणी झाली आहे. आमच्या देशात आज ज्या वाईट गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत, त्याचं प्रमुख कारण भारतीय सांस्कृतिक मूल्यांची अवहेलना हेही एक आहे. सेवाभावनेचं स्थान स्वार्थ भावनेनं घेतलंय. आपल्या  सांस्कृतिक सुख-सुविधांच्या पूर्तीसाठी कोणत्याही वाईट मार्गाचा तो अवलंब करू शकतो. निसर्गाविषयीचं प्रेम विज्ञानाच्या वेदीवर बळी दिलं गेलंय. वनांचा विनाश केला जातोय आणि वाळवंट वाढताहेत. काटेरी झुडपं आणि वाळवंट यांनी आता आमच्या मनात घर केलेलं आहे. याविषयीही आम्ही अनभिज्ञ आहोत; पण अजून वेळ गेलेली नाही. आमच्या साहित्यिकांनी, कलाकारांनी पुढं यावं आणि भारत देशाला या महान संकटापासून वाचवावं.’’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com