जैवइंधन म्हणजे जिवंत वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळवलेले इंधन. वनस्पती आणि प्राणी मुख्यत: कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन व थोडय़ा प्रमाणात इतर खनिज यांपासून बनलेले असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, जमिनीतील पाणी आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा वापरून वनस्पती, शेवाळे आणि इतर हरित वनस्पतीसारखे जिवाणू प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे शर्कारामय कबरेदके तयार करतात. ही कबरेदके त्या वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी व संवर्धनासाठी उपयोगात येतात व त्यातूनच प्राणिजगतासाठी अन्नपुरवठा होतो. ह्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेतून निर्माण झालेल्या कबरेदकांपासून जैववस्तुमान तयार होते. जैवइंधनात जैववस्तुमान, जैवतेल व जैववायू यांचा समावेश असतो. जैववस्तुमानावर जीवरासायनिक प्रक्रिया वापरून इथेनॉल म्हणजेच दारू व तत्सम इतर रसायने पण निर्माण होऊ शकतात. त्यातील काही रसायनेही इंधन म्हणून वापरता येतात.
सध्याची पेट्रोरासायनिक खनिज तेलेसुद्धा प्राणी आणि वनस्पतीपासून तयार झालेली आहेत व ती एक प्रकारची जैवइंधनेच म्हणता येतील. फक्त ही खनिजतेले हजारो-लाखो वर्षांपूर्वी सडलेल्या व पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या प्राणी आणि वनस्पती यांवर तेथील उष्णतेच्या व दबावामुळे झालेल्या रासायनिक प्रक्रियेपासून तयार झालेली असतात. रूढार्थाने मात्र केवळ सध्याच्या काळात जगत असलेल्या वनस्पतीपासून जी इंधने तयार होतात त्यालाच ‘जैवइंधन’ असे म्हणतात.

अगदी पुराणकाळापासून जेव्हा माणसाने अग्नीचा शोध लावून शिजलेले अन्नप्राशन करण्यास सुरुवात केली तेव्हापासून तो आजपर्यंत इंधनाची गरज सतत वाढत गेली आहे. सुरुवातीला लाकडे जाळून माणसाची इंधनाची गरज भागत होती. पण प्रगती होत गेली तसतशी त्याची ऊर्जेची गरज वाढत गेली. जेव्हा पृथ्वीच्या पोटातील खनिजतेलांच्या साठय़ाचाही शोध लागला नि माणसाची कार्यक्षमता आणि गती अमर्याद वाढली.
अलीकडे इंधनाच्या उपलब्धीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे अनुमान आहे की खनिजतेलाचे व कोळशाचे साठे  ५०-६० वर्षांपेक्षा जास्त पुरणार नाहीत. हे साठे संपतील तसे त्याच्यावरून लढाया होतील! आपण आता जर खनिज तेल व कोळशाला पर्याय शोधला नाही तर आपल्या पुढील पिढय़ांसाठी इंधनसाठा शिल्लक राहणार नाही.

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

प्रबोधन पर्व: प्रतिकार हे कोतेपणाचे लक्षण नसते
‘‘..आज प्रत्यक्ष हिंदू समाजात सर्वच प्रकारच्या भिन्नत्वाच्या कल्पना प्रभावी आहेत. जातीबद्दलची उच्चनीचत्वाची भावना आहे. पोटजातीबद्दलचा अभिमान आहे व त्याबरोबरच प्रादेशिक व भाषिक भिन्नत्वाच्या कल्पनांचा पूर्ण पगडा आहे.. जोवर प्रत्येक पंथ, जात, गट आपापले वैशिष्टय़ निराळे मानतो व त्याप्रमाणे वागतो तोवर भारतीयतेचा कितीही डांगोरा पिटला, तरी आमचा समाज अनेकविध विभागलेला आणि म्हणून दुर्बळ राहणार. तसेच राष्ट्राभिमानाचा अतिरेक व दुष्परिणाम होतात ते राष्ट्रनिष्ठा या एकाच कल्पनेस फाजील महत्त्व दिल्यामुळे.’’ परस्पर सहकार्य आणि सामंजस्य संपले की काय होते, याविषयी ध. रा. गाडगीळ १९६० सालच्या लेखात (लेखसंग्रह खंड २) म्हणतात –
‘‘व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, राष्ट्र, खंड, जग ही एक श्रेणी मानता येईल. या श्रेणीतील प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विशिष्ट कर्तव्य असते. सर्वाची अधिकारक्षेत्रे प्राय: एकमेकांपासून विभिन्न, निराळी. जोवर एकाचे दुसऱ्यावर अतिक्रमण होत नाही तोवर एकमेकांत विरोध उत्पन्न होण्याचे काही कारण नाही. यांतील कोणत्याही एकाचे स्थान इतरांहून विशेष श्रेष्ठ व निष्ठा बाळगावयाची ती त्या बाबतचीच असे म्हटल्याने अतिरेक होतो व बेबंदशाही अगर हुकूमशाही, अराजक किंवा केवळ दंडनीती या कुठल्यातरी टोकाकडे समाज साहजिकच झुकतो. गाव व प्रदेश यांनी राष्ट्रास न मानले तर बेबंदशाही माजेल. उलट राष्ट्राभिमान, देशाची एकता या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी राष्ट्राच्या सरकारने कुटुंब, गाव अगर प्रदेश यांच्या योग्य हक्कांवर अतिक्रमण केले, यांपैकी कोणास अन्यायाने वागविले तर ते, गाव-प्रदेशाहून राष्ट्र मोठे, म्हणून निमूटपणे सहन केले पाहिजे असे नाही; किंबहुना समाजाचा समतोल राखण्याकरिता अशा अतिक्रमणाचा योग्य प्रकारे प्रतिकार करणे हे कर्तव्यच ठरते. असला प्रतिकार कोतेपणाचे लक्षण नसून खऱ्या अर्था राष्ट्रहित साधणाराच आहे.’’

मनमोराचा पिसारा: फिर वही शाम
प्रेमात पडण्याचा तो क्षण सुखाची परमावधी गाठणारा असला तरी त्या एका अनुभूतीनंतर प्रेमिकांच्या पदरी विरहाच्या वेदनाच येऊन पडतात. त्याची किंवा तिची आठवण मनाला बेचैन करते. जिवाला हुरहुर लावते. त्या व्यक्तीशिवाय जीवन असह्य़ वाटतं. ती तडप, कशीश हा प्रेमिकांच्या आयुष्याचा भोगवटा ठरतो.
कधी दुर्दैवाने, आपण त्या व्यक्तीला कायमचे मुकतो आणि दु:खाला पारावार राहत नाही. अशा वेळी विरहानं दाटलेली गाणी मनाला क्षणभर रिझवतात. डोळ्यातनं पाझरणारे अश्क आपलेसे वाटतात, कारण तिच्या नावानं ते गालावर ओघळलेले असतात.
मोठं अजब असतं, माणसाचं जीवन. प्रेम हे वरदान की शाप, असा संभ्रम पडावा इतकं!
यातूनच प्रसवल्या शेकडो शायरी, नज्म आणि गाणी. यातलं एक अतिशय हृद्य गाणं. दिल की बाते, होठोंपर आणणारं हे गाणं मनात एखाद्या ‘स्लो पॉयझन’सारखं भिनत जातं.
गाण्याचे बोल अतिशय बोलके. प्रेमात आता उरलीय फक्त तुझी आठवण. रोजचा दिवस, संध्याकाळी मनात सदैव घोळणारं तुझ्या विरहाचं दु:ख. कल्पनाशक्तीच्या जोरावर तुझी जवळीक साधता येते. मग वाटतं, काळाची पावलं मागे उमटली आणि पुन्हा आपली पहिली भेट झाली. मनाला तेवढीच तसल्ली.
तुझ्याशी आता भेट नाही व्हायची, तुझ्या-माझ्या प्रेमाची कहाणी अधुरी राहणार आणि तुझी नि माझी वाटचाल वेगळ्या दिशेनं होणार. आता मनात जपलेल्या तुझ्या आठवणी माझी साथ करताहेत, समजूत काढताहेत.

तलतच्या दर्दभऱ्या आवाजातलं हे गाणं खास संध्याकाळच्या मैफलीसाठी. ही माझी एकटय़ाची मैफल, तुझ्या आठवणीशिवाय कोणाला प्रवेश नाही..
फिर वही शाम, वही गम, वही तनहाई है
दिल को समझाने तेरी याद चली आयी है
फिर तसव्वूर तेरे पहलू में बिठा जाएगा
फिर गया वक्त घडी भरको पलट आएगा
दिल बहल जाएगा, आखिर को तो सौदाई है
जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के न हो
जो अधुरी रही वो बात कभी हो के न हो
मेरी मंझिल तेरी मंझिल बिछड आयी है!
संगीत- मदन मोहन, गीतकार- राजेंद्र कृष्ण, चित्रपट ‘जहाँ आरा’,     भारत भूषण, माला सिन्हा.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com