डॉ. मानसी राजाध्यक्ष उष्णता धारण करण्याची पाण्याची क्षमता खूप जास्त आहे. तसाच पाण्याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे अनेक पदार्थ पाण्यात अगदी सहजी विरघळतात. त्यातच पाण्याचे तापमान जसे वाढेल तसतसे, त्यात पदार्थ जास्त प्रमाणात विरघळू शकतात. पावसाचे पाणी खडकांमध्ये खोलवर जाते. तिथे उष्णता शोषून गरम होते. अशा गरम पाण्यात, त्या खडकांमध्ये किंवा मातीत असलेली अनेक रसायने म्हणजेच खनिजे विरघळतात. जमिनीच्या थरांखाली दाब वाढत जातो आणि तापमानही जास्त असते. त्यामुळे या थरांमध्ये असलेली अनेक खनिजे पाण्यात मिसळतात. सिलिका, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांच्या खनिजांचे प्रमाण बरेच असते. त्यातच मातीत असलेले सल्फरही पाण्यात मिसळते. तापमानामुळे, या सल्फरचा काही भाग सल्फेटच्या क्षारांमध्ये तर काही भाग हायड्रोजन सल्फाईड या वायूमध्ये रूपांतरित होतो. या वायूला कुजक्या अंडय़ासारखा उग्र दर्प येतो. जिथे जिथे गरम पाण्याचे स्रोत आहेत, तिथे तिथे हा वास येतो. सल्फर अनेक जीवजंतूंचा नायनाट करतो, म्हणून तर उष्ण पाण्याच्या झऱ्यात स्नान केले तर आपल्या शरीराची बाह्य त्वचा स्वच्छ होते, असे म्हणतात. हा सल्फरचा गुणधर्म जरी खरा असला तरी सल्फरचे पाण्यातले प्रमाण महत्त्वाचे आहे. खूप जास्त प्रमाणात सल्फर आरोग्याला घातक ठरू शकतो. कधीकधी सल्फरबरोबर आर्सेनिक हे मूलद्रव्यही आढळते, जे अत्यंत घातक आहे. सल्फेटचे प्रमाण जास्त असलेले झरे हे आम्लधर्मी तर क्लोराईडचे प्रमाण जास्त असलेले झरे अल्कधर्मी असतात. बरेचसे जिवाणू, उष्ण वातावरणात तग धरू शकत नाहीत. तर काही जिवाणू आणि अमिबांचे प्रकार हे उष्ण तापमानातच वाढतात. बऱ्याच उष्ण झऱ्यांच्या पाण्यामध्ये या जिवाणूंची वस्ती असते. अशा पाण्यात डुबकी मारताना, त्यातील काही प्रकारचे जिवाणू नाकातोंडावाटे शरीरात गेले तर त्रास होऊ शकतो. तेव्हा उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान चांगले, पण जर ते ठरावीक तापमानाचे असेल, जर ते अति आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी नसेल, जर त्यात आर्सेनिकसारखी घटक रसायने नसतील, जर आपण ते आपल्या नाकातोंडात जाऊ दिले नाही, जर आपण अगदी मोजका काळच त्या पाण्याच्या संपर्कात राहिलो आणि जर आपल्याला, उष्ण पाण्याच्या संपर्काचा त्रास होण्यासारखा कोणताही विकार नसेल, तरच!