पृथ्वीची उत्पत्ती होऊन ४५४ कोटी वर्षे झाली. पण जीवसृष्टी त्यानंतर खूप उशिरा निर्माण झाली. कारण जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती तयार होईपर्यंत सुमारे सव्वाशे कोटी वर्षे लागली. जीवसृष्टीच्या निर्मितीच्या आरंभीच्या काळात ज्यांना मुक्त ऑक्सिजनची गरज नसते असे अवायुजीवी (अॅनेरोबिक) सूक्ष्मजीव अवतरले. हळूहळू उत्क्रांती होत गेली. कारण वातावरणात ऑक्सिजन उपलब्ध झाला. ऑक्सिजनमुळे जीवसृष्टीची भरभराट झाली, तरी सजीवांचे जीवाश्मरूपाने जतन होण्यासाठी कवच किंवा हाडे यांची आवश्यकता होती. कालांतराने कॅल्शियम उपलब्ध झाला. आणि मग ५४ कोटी वर्षांपासून सजीवांचे जीवाश्मरूपाने जतन होऊ लागले.

५४ कोटी वर्षांपूर्वीची जीवसृष्टी आजच्या जीवसृष्टीपेक्षा खूप वेगळी होती. त्यावेळी प्राण्यांचे जे विविध गट निर्माण झाले, त्यातला भुजापाद संघ (फायलम ब्रॅकिओपोडा) हा जोरात फोफावलेला गट होता. वरपांगी मृदुकाय (मॉलुस्का) संघातल्या शिंपल्यांशी साधर्म्य दिसले, तरी हे प्राणी खूप वेगळे आहेत. आणि ते फक्त सागरी पर्यावरणात, आणि उथळ पाण्यात, समुद्राच्या तळाशी आढळतात.

त्यांचे कवच कॅल्शियम कार्बोनेटचे तरी असते किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे तरी. कवचाच्या पाठीमागच्या टोकाजवळ एक छिद्र असते. त्यातून स्नायूचा एक देठ बाहेर पडतो आणि कोंब जसा जमिनीत घुसतो, तसा तो देठ समुद्रतळाच्या अवसादात, म्हणजे गाळात घुसतो. त्या देठाला ‘सानपाद’ (पेडिकल) म्हणतात. त्यामुळे सर्व भुजापाद आयुष्यभर एका ठिकाणी जखडलेले असतात. प्राचीन काळी हजारोंच्या संख्येने ते समुद्रतळाशी चिकटून असत. त्यावर नवीन अवसादाचा थर बसला की त्यांची संपूर्ण वसाहत गाडली जात असे; आणि मोठ्या संख्येने त्यांचे जीवाश्मीभवन होत असे. भारतात त्यांचे जीवाश्म हिमालय पर्वतराजी, तमिळनाडू, कच्छ, माळवा, मारवाड या भागात मिळतात.

सुरुवातीला जोमाने फोफावलेल्या या संघातल्या प्राण्यांची संख्या घटत गेली. इतर वर्गांमधल्या प्राण्यांशी जी अस्तित्वाची स्पर्धा होती त्यात भुजापाद संघ मागे पडला. आजमितीस या संघाच्या केवळ ६० प्रजातींमध्ये विभागलेल्या सुमारे १८० जाती कशाबशा तग धरून जिवंत आहेत. आणि हा संघ आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या संघातल्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातींच्या अभ्यासावरून पचनसंस्था आणि श्वसनसंस्था अत्यंत अकार्यक्षम असल्यामुळे हा संघ आपल्या अस्तित्वाची लढाई हरत असल्याचे स्पष्ट होते.

फार पूर्वीच्या काळी जिथे त्यांच्या मोठमोठ्या वसाहती होत्या, तिथे काही ठिकाणी मृत भुजापाद प्राण्यांची कवचे एकत्र येऊन कॅल्शियम फॉस्फेटचे साठे निर्माण झाले आहेत.

डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org