जागतिक हवामान दिन प्रतिवर्षी २३ मार्चला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जिनेव्हा स्थित ‘जागतिक हवामान विभागातर्फे’ साजरा होतो. या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक राष्ट्रांकडून त्यांचा हवामान बदलाचा सांख्यिकी अहवाल गोळा करणे, त्यांची आपआपसात देवाणघेवाण करणे आणि हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या राष्ट्रांना सर्व प्रकारची तांत्रिक मदत देणे. थोडक्यात हवामान बदलामध्ये प्रत्येक नागरिकाचे स्थान आणि त्याच्या जीवनशैलीचा पृथ्वीच्या वातावरणावर कसा परिणाम होतो हे समजावून सांगणे आणि लोकांना त्यानुसार बदलण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने जागतिक हवामान दिन २३ मार्च १९६१ पासून सुरू झाला. या दिवशी जागतिक हवामान विभागातर्फे एक घोषवाक्य दिले जाते. २०२१ मधील घोषवाक्य होते ‘‘समुद्र, आपले वातावरण आणि हवामान’’ तर या वर्षी म्हणजे २०२२ मधील घोषवाक्य आहे ‘‘त्वरित सूचना आणि तात्काल उपाय’’ या घोषवाक्याचा मथितार्थ आहे, हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि मिळालेल्या इशाऱ्यावर त्वरित निर्णय घेऊन स्थावर तशीच मानवी संहार वाचविण्याचा प्रयत्न करा. या वर्षी २३ मार्चला येणाऱ्या हवामान दिनाच्या निमित्ताने जागतिक हवामान संघटनेने एक छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये स्पर्धकाने वातावरण बदल आणि त्याचा निसर्गावर होणारा परिणाम या संबंधी छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन केले होते. जगभरातून हजारो हौशी छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला, आयोजकांनी यामधून १३ उत्कृष्ट छायाचित्रे निवडली आणि दिनदर्शिकेच्या रूपात ती आता सर्वाना उपलब्ध करून दिली आहेत. २३ मार्च हवामान दिनानिमित्त विविध देशात परिषदा, कार्यशाळा आयोजित करून लोकांना, राज्यकर्त्यांना हवामान बदलाबद्दल जागृत केले जाते आणि भविष्यामधील संकटांबद्दल माहितीसुद्धा दिली जाते. समुद्र किनाऱ्यालगतची शहरे आणि शेती यापुढे हवामान बदलाच्या प्रभावाखाली असणार आहेत, सतत बदलणारे हवामान आणि त्यास अनुकूल असणारा पाऊस, वादळ, वारे, दुष्काळ याबद्दल शासनास योग्य उपाय सुचित करणे हा सुद्धा या दिवसाचा एक उद्देश आहे. वास्तविक सर्व नैसर्गिक समस्यांचे मूळ हवामान बदलामध्येच आहे, पण इतर पर्यावरणीय दिन साजरे करून त्याचे अहवाल सादर करताना या सर्वाचे मूळ असणारा हवामान बदल आणि त्याचा २३ मार्च हा दिन आपल्यासाठी अनेक वेळा पर्यावरण दिनदर्शिकेमध्ये दाखवण्यापुरताच मर्यादित राहतो. ज्या बदलत्या हवामानाचा आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला संबंध असतो, त्यास असे दुर्लक्षित करून कसे चालेल हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे. - डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org