ईशान्य भारतात वसलेले मेघालय राज्य सदाहरित जंगले, धबधबे, मोठमोठाल्या नैसर्गिक गुहा आणि समृद्ध जैवविविधतेने नटले आहे. मेघालय या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘मेघांचे निवासस्थान’ असा होतो. ज्याला आपण ‘मेघालयाचे पठार’ किंवा ‘शिलाँग पठार’ म्हणतो ते हिमालयाच्या निर्मितीसमवेत, भारतीय भूपट्टाच्या (इंडियन प्लेट) ईशान्येकडे झालेल्या भूगर्भातल्या संरचनात्मक हालचालींमुळे (स्ट्रक्चरल मुव्हमेंट्स) निर्माण झाले. या पठाराच्या उत्तरेच्या बाजूला आणि दक्षिणेच्या बाजूला असणारे प्रदेश हे प्रस्तरभंग (फॉल्ट) होऊन खाली खचले. यातल्या उत्तरेकडच्या प्रस्तरभंगाला ‘ब्रह्मपुत्रा प्रस्तरभंग’ म्हणतात, तर दक्षिणेकडच्या प्रस्तरभंगाला ‘डाउकी प्रस्तरभंग’ म्हणतात.

या दोन प्रस्तरभंगांच्या मधला मेघालयाच्या पठाराचा प्रदेश वर उचलला गेला. अशा रीतीने वर उचलल्या गेलेल्या प्रदेशाला भूवैज्ञानिक परिभाषेत उद्धृतभूमी (हॉर्स्ट) म्हणतात. जसे या पठाराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला प्रस्तरभंग आहेत, तसेच पूर्वेला आणि पश्चिमेलाही आहेत. पूर्वेकडच्या प्रस्तरभंगाला ‘धुब्री प्रस्तरभंग’, तर पश्चिमेकडच्या प्रस्तरभंगाला ‘कोपिली प्रस्तरभंग’ म्हणतात.

शिलाँग पठार सांरचनिक घडामोडींतून निर्माण झाले आहे. याखेरीज ते भूकंपप्रवण असणाऱ्या दोन पर्वतरांगांच्या समीप आणि मधोमध येते. हिमालयाची रांग या पठाराच्या अगदी जवळ उत्तरेकडे, तर अराकान योमा पर्वतरांग या पठाराच्या अगदी जवळ पूर्वेकडे आहे. या सर्व कारणांनी हे पठार भूकंपप्रवण आहे. १८९७ च्या विनाशकारी शिलाँग भूकंपामुळे या पठाराचा उत्तरेकडील भाग सुमारे १० मीटरनी उचलला गेला होता.

हे पठार उद्धृतभूमी असल्याने ते चहुबाजूंच्या सपाट भूमीपेक्षा खूप उंचावर आहे. विशेषत: दक्षिणेच्या बाजूला बांगलादेशाचा मैदानी प्रदेश खूपच खाली आहे. समुद्रसपाटीपासूनची पठाराची उंची आणि मैदानाची उंची यात जवळजवळ १,५०० मीटरचे अंतर आहे. परिणामी, पठाराच्या दक्षिण दिशेची पठाराची पूर्व-पश्चिम दिशेने जाणारी कित्येक किलोमीटर लांब असणारी कड अगदी स्पष्ट दिसते. ही सर्व लक्षणे उद्धृतभूमीच्या वैशिष्ट्यांशी सुसंगत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पठाराचे क्षेत्रफळ सुमारे २२,४३० चौरस किलोमीटर इतके असून याची सरासरी उंची १,५०० मीटर आहे. शिलाँग शिखर (१,९६६ मीटर उंच) हे या पठारावरचे सर्वोच्च शिखर आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे पठार अडवते. त्यामुळे मेघालयातल्या चेरापुंजी आणि मौसिनराम या गावांच्या परिसरात जगातला सर्वांत जास्त पाऊस पडतो. वरवर बघता हा भाग हिमालयाचाच भाग असावा असे वाटते. पण भूवैज्ञानिकदृष्ट्या हा भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहे. या पठारातल्या पाषाणसमूहांचे साधर्म्य हिमालयातल्या पाषाणसमूहांपेक्षा द्वीपकल्पातल्या पाषाणसमूहांशी जास्त आहे.