सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात पावलोपावली धोकेच धोके जाणवत आहेत. या धोक्यांचे किंवा जोखमींचे व्यवस्थापन हा सामान्य माणसापासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत सर्वाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काही जण ते मान्य करतील, तर काही जण ते मान्य करणार नाहीत, पण ही वस्तुस्थिती आहे हे तितकेच खरे.
‘धोका व्यवस्थापन’ ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे पाच टप्प्यांत विभागली जाते. हे टप्पे- १) धोके ओळखणे २) धोक्यांचे मूल्यमापन करणे ३) धोक्यांवर नियंत्रण ठेवणे अर्थात त्याची तीव्रता कमी करणे अथवा ते टाळणे, त्याकरिता काही खर्च करणे. ४) धोक्यांचा स्वीकार करणे ५) धोक्यांचे हस्तांतरण करणे.
धोका व्यवस्थापनाचे हे सर्व टप्पे किती व कसे महत्त्वाचे आहेत ते आपण बघूया. पहिली पायरी- धोके ओळखणे. या पायरीवर जर ‘गफलत’ झाली, तर ‘धोका व्यवस्थापन’ प्रक्रियेचा संपूर्ण डोलारा डगमगू शकतो. या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून ‘स्त्री’ लक्षात घेऊया. स्त्रीला धोके ओळखण्याची कला उपजतच साध्य झालेली असते व ती पदोपदी याचा पुरेपूर उपयोग करत असते.
धोके ओळखण्याची पायरी पार केल्यावर त्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. ही थोडी गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया आहे. यामध्ये कुठले धोके जास्त नुकसान करणारे आहेत? कुठल्या धोक्यांची तीव्रता अधिक आहे? कुठल्या धोक्यांची वारंवारता जास्त आहे? इत्यादी. यामुळे आपल्याला धोक्यांची क्रमवारी ठरवता येते. तिसरी पायरी ही पहिल्या दोन पायऱ्यांवर आधारित घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या अंमलबजावणीची आहे. इथे आपण उदाहरण घेऊ म्हणजे पोलिसांनी बेभान जमावावर केलेला पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा किंवा अश्रुधुराचा वापर. दुसरे असे की, तापाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण डोक्यावर थंड पाण्याची घडी ठेवतो आणि ती वारंवार बदलतो. असे न केल्यास जमाव नियंत्रणाबाहेर जाऊन दंगलीचा धोका संभवतो किंवा ताप मर्यादेबाहेर जाऊन रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो.
अभय गुजर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet
First published on: 13-12-2012 at 03:53 IST