फ्लोरेन्स किंवा फिरेन्झ हे शहर सध्या इटालीच्या टस्कनी या प्रांताचे प्रमुख शहर आणि राजधानी होय. मध्ययुगीन काळात युरोपीयन देशांशी व्यापार आणि सावकारी यांच्या उत्पन्नावर वैभवसंपन्न बनलेले ते एक ऐतिहासिक रेनेसाँ काळातील महत्त्वाचे शहर होय. त्यामुळे फ्लोरेन्सला ‘अ‍ॅथेन्स ऑफ द मिडल एजेस’ असेही म्हटले जाते. युरोपीय रेनेसाँ म्हणजेच प्रबोधनकाळ फ्लोरेन्समध्येच सुरू झाला. इ.स. १८६५ ते १८७१ या काळात इटालीच्या राज्याची राजधानी फ्लोरेन्समध्येच होती. प्रबोधन काळात फ्लोरेन्सच्या राज्यकर्त्यां मेदीची घराण्याच्या शासकांनी प्रोत्साहन दिल्यामुळे निर्मिल्या गेलेल्या उत्तमोत्तम चित्रकृती, शिल्पकृती आणि वास्तुशिल्पांचे फार चांगल्या प्रकारे जतन करून येथे ठेवलेले आहे. १९८२मध्ये युनेस्कोने फ्लोरेन्सचा जागतिक वारसा म्हणून नोंद केली आहे. सध्याच्या फ्लोरेन्स नगर प्रशासनाने शहराची पाच बरोजमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक बरोजचे एक सल्लागार मंडळ आणि एक अध्यक्ष असतो. फ्लोरेन्सच्या प्रशासनासाठी छत्तीस लोकांच्या सल्लागार मंडळाची निवड पाच वर्षांसाठी केली जाते. या सल्लागार मंडळाला ‘कॉन्सिग्लिओ कम्युनेल’ म्हणतात. या ३६ जणांच्या सिटी कौन्सिलमधून सात असेसर्सची कार्यकारी समिती निवडली जाते. बरोजच्या अध्यक्षांमधून सिटी मेयरची निवड होते. सध्या फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या ३,८०,००० आणि उपनगरीय लोकसंख्या पंधरा लाख आहे. मध्ययुगीन आणि प्रबोधन काळातील असंख्य कलाकृती, शिल्पकृती आणि वास्तुशिल्पे नीट जतन करून ठेवल्यामुळे फ्लोरेन्स हे जगातील सुंदर शहरांपकी एक ठरले आहे. या छोटय़ा शहरातील एका भागात असंख्य कलादालने, म्युझियम्स असून तिथे पर्यटकांची वर्दळ कायमच असते. फ्लोरेन्सच्या या भागात प्रदूषण होऊ नये म्हणून सार्वजनिक वाहतुकीसाठी फक्त इलेक्ट्रिक ट्राम चालतात, बस वाहतुकीस बंदी आहे. फ्लोरेन्सच्या बाकी भागात बससेवा हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. फ्लोरेन्सचे अर्थकारण प्रामुख्याने पर्यटन, व्यापार आणि सावकारी यावर चालते. अलीकडे फ्लोरेन्स हे इटालियन फॅशनचे आगर झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

झायमेल काष्ठ

मुळांचे मूळ कार्य म्हणजे झाडाला आधार देणे आणि जमिनीतून पाण्याचे शोषण करून ते खोड, फांद्या, पाने, फुले आणि फळांना पोहोचवणे. पाणी शोषण्याचे कार्य मुळांच्या टोकाजवळ असणारी केशमुळे करतात. केशमुळांनी शोषलेले पाणी मुळांमध्ये येते आणि तेथून झायलेम काष्ठ या पेशी मार्गाने संपूर्ण वृक्षामध्ये खेळवले जाते. तलावासारख्या मोठय़ा जलाशयातून पाणी घेऊन मोठे पाइप, लहान पाइप आणि नंतर घरातील नळ या मार्गाने घरोघरी पाणी पोहोचते. त्याचप्रमाणे भूगर्भातील जलसंचयामधील पाणी मुळांच्या केशनलिकामधील लहानशा झायलेम काष्ठच्या पाइप व्यवस्थेला जोडले जाते. वनस्पतींमधील जलव्यवस्थापन हा निसर्गातील एक चमत्कार आहे. ही जलवाहतूक नळीसारख्या पेशीमधून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होते. यामध्ये अनेक क्षारसुद्धा असतात. या प्रक्रियेस ऊर्जा लागते. पाण्याच्या लाखो रेणूंची साखळी कुठेही न तुटता मुळापासून झाडापर्यंत दिवसरात्र चालू असते, ती झायलेम काष्ठ एकमेकांस जोडलेल्या नळीसारख्या पेशीमुळेच. नारळासारख्या झाडात जमिनीपासून टोकापर्यंत याच पद्धतीने पाणी वर चढते. वर चढणारे क्षारयुक्त पाणी म्हणून याला अ‍ॅसेट ऑफ सॅप म्हणतात. जमिनीत जास्त क्षार असतील तर मुळांची पाणी शोषण्याची क्रिया मंद होते. त्याचप्रमाणे तेथे ऑक्सिजनची कमतरता असेल तर मुळांच्या पाणी शोषण्याच्या कार्यावर परिणाम होतो. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असेल तर तेही मुळांसाठी वाईट असते. शेतात अथवा वृक्षाच्या मुळाशी पाणी बरेच दिवस साठलेले असेल तर ऑक्सिजनच्या अभावी मुळे सडून जातात. नाल्यामधील प्रक्रिया न केलेले पाणी मुळांना दिले गेल्यास झाडाच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. प्रखर सूर्यप्रकाशात बाष्पीभवन खूप वेगाने होते. अशावेळी निर्माण झालेली पाण्याची कमतरता मुळांकडून भरून काढली जाते. उन्हाळ्यात वृक्षांची मुळे कायम पाण्याच्या शोधात जमिनीखाली समांतर आणि खोलवर प्रवास करत असतात. थेंब थेंब पाण्याचा उपयोग करतात. पाण्याच्या थेंबाचे महत्त्व त्यांना कळते, आम्ही मात्र सुशिक्षित असाक्षर.

डॉ. नागेश टेकाळे  

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टी, मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays florence city in italy
First published on: 07-06-2016 at 04:21 IST