महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या. पोटापाण्यासाठी आदिवासी स्थलांतर करू लागला. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या वेळी कोयनानगर सातारा येथील श्रमजीवी संघटना त्यांच्या मदतीला धावली. मच्छीमारीतून त्यांना उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी विचार सुरू केला. पूर्वी दोन आदिवासी संस्थांनी सुरू केलेली तलावातील मच्छीमारी मासळीअभावी तोटय़ात गेली होती. त्यांच्यासह अजून चार संस्था नोंदणीकृत केल्या आणि आठ तलाव भाडेपट्टीने घेतले.
तलावात मासळीचे प्रमाण वाढवण्यासाठी रोहू, कटला, मृगल या गोडय़ा पाण्यात तीन स्तरांवर संचार करणाऱ्या माशांचे बीज तलावात सोडले. २००६ साली मासेमारीला सुरुवात केली. पण मागवलेले मत्स्यबीज निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर केलेला खर्च फुकट गेला. उत्पादनही मिळाले नाही. तरीही उमेद न हरता मत्स्यबीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. खैरलवंग येथे पंधरा एकर जमीन भाडय़ाने घेऊन, मदत मिळवून अगदी कमी खर्चात तेथे मत्स्यबीज केंद्र उभे केले. मच्छीमारांना प्रशिक्षण दिले, जेणेकरून केंद्र पूर्णपणे त्यांचे त्यांनाच चालवता यावे.
वर्षांतून दोन टप्प्यांत चालणाऱ्या बीजनिर्मितीत जास्तीतजास्त चक्रे पूर्ण केल्यामुळे बीजनिर्मिती वाढली. खात्रीशीर मत्स्यबीजांमुळे माशांचे उत्पादनही वाढले. आठ तलावांत दिवसाला सरासरी पाचशे किलो मासेमारी व त्यांची विक्री केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांत ५६ टनांची मासेमारी झाली. पहिल्याच वर्षी २०१० मध्ये सव्वा कोटी मत्स्यबीज तयार झाले. २०१२ मध्ये ही संख्या १ कोटी ८६ लाखांवर गेली. गेल्या वर्षी विविध संस्था, आदिवासी संस्था यांना १७ लाख तर या वर्षी १८ लाख मत्स्यबीजांचे मोफत वाटप केले.
महाडमधील सुमारे तीन हजार आदिवासी व पोलादपूर मधील एक हजार कुटुंबांना रोजगार तर मिळालाच, पण स्थर्यताही मिळाली. अल्पशिक्षित आदिवासींना प्रशिक्षित केल्यास ते मत्स्यबीज केंद्र यशस्वीपणे चालवू शकतात, हे यांतून सिद्ध झाले आहे.
– चारुशीला जुईकर, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – आपला देश आणि विज्ञान
गेल्या वर्षी मी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानात एका परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून गेलो होतो. परिसंवादाचा विषय ‘छानपैकी कसे जगावे’ असा होता. तिथे अनेक वक्त्यांनी आपल्या परंपरांचा उल्लेख करीत सखोल विवेचन केले. तिथे एक थत्ते नावाचाच तरुण भेटला. तो अरण्यातल्या पाडय़ांवर समाजसेवा करायला गेला. मूळ बोरिवलीचा; परंतु तिथेच रमला आणि परत आलाच नाही. लग्न झाल्यावर बायकोही तिथेच राहिली. ते आधीच ठरले होते. त्यांना एक मुलगी आहे. तिला जिल्हा स्तरावरच्या चांगल्या शाळेत घातली होती, पण ती अरण्यापासून दूर जायला कंटाळली आणि पाडय़ावरच्या अर्धवट शाळेला तिने पसंत केले.
हा माणूस म्हणाला, तुम्ही ५० रुपयांना पाव किलो कर्टुली विकत घेता. ती आमच्याकडे अमाप उगवतात आणि तोडून कोणी तरी आपल्याला खाईल, याची वाट बघतात. थोडय़ा भाज्या आम्ही पिकवितो. काही आपोआप उपलब्ध असतात. एका विशिष्ट शेवाळ्याची भाजीसुद्धा चविष्ट लागते. मुलगी आजी-आजोबांकडे बोरिवलीला आली होती. संध्याकाळी ७ वाजता बाहेर जायचे ठरले तेव्हा ती आजीला म्हणाली, ‘‘खूप उशीर झाला. सातनंतर बिबळे बाहेर येतात. आपण उद्या जाऊ.’’
मात्र त्या थत्तेने एक मोठी विलक्षण नोंद केली. म्हणाला, ‘‘आमच्याकडे संगणक आणि इंटरनेट आहे. त्यामुळे आम्ही तिघे तुमच्यात नसलो तरी तुम्ही मात्र आमच्यात असता.’’ हा विज्ञानाने घडविलेला आणि आपल्यातल्या अनेक जणांनी आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानाचा आश्चर्यकारक परिणाम आहे. त्या परिसंवादानंतर तिथल्या पुस्तक प्रदर्शनात मी ‘भारताची शान : भारतातील प्राचीन विज्ञान’ असे शीर्षक असलेले इंग्रजी पुस्तक बऱ्यापैकी किमतीला विकत घेतले. ते घरी येऊन वाचले तेव्हा मात्र कपाळमोक्ष झाला.
पुस्तकाचा हेतू उत्तमच आहे, पण त्याच्यातला तुटपुंजा मजकूर वाचून माझी नशा उतरली. त्या काळातील ती प्रगती आश्चर्यकारकच. आणखीही असणार आणि लुप्त झाली असणार, पण एवढय़ाशा भांडवलावर आपण मान ताठ करून चालावे, हे जरा विपरीतच. शिवाय भाषा संस्कृत आणि विवेचनातले काही निर्णय मुदलाच्या मानाने जरा व्यस्तच. त्या पुस्तकात गणितही होते; परंतु एका भास्कराचार्यावर आपण पिढीजात जगावे, हा दारुण आणि करुणास्पद विनोदच आहे, हे लक्षात आले.
लहान-सहान गोष्टींत जन्मभर प्रतिभा, प्रज्ञा आणि प्रयत्न याच्या जोरावर गेल्या ३०० वर्षांत पाश्चिमात्य देशांत किमान एक हजार (खरे तर १० हजार) आचार्य होऊन गेले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या नोंदी पुसटशा जरी बघितल्या तरी अंधारी येते. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ५
५) अंगदुखी- ज्वरांकुश, टाकणखारलाही, मनातेल, सिंहनाद गुग्गुळ. ६) अंधेरी, चक्कर, भ्रम, फेकल्यासारखे होणे- चंद्रकला, लघुसूतशेखर. ७) आग, दाह, चटका बसणे, हातापायांची आग- कामदुधा, मौ.भस्म, शतधौत. ८) आर्तवशूल (मासिकपाळी शूल)- गोक्षुरादि गुग्गुळ, लघुसूतशेखर. ९) आगपैण, खवडे, त्वचाविकार, खाज, पूरक्तासह- एलादिल तेल, शतधौत धृत, करंजेल+कापूर १०) आमवात, अंग आंबणे, विलक्षण वेदना, जखडणे, सूज- सिंहनाद, गोक्षुरादि गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी, मनातेल, तुरटी, रसायनचूर्ण.
११) आमांश, चिकट संडास, कळ येऊन पोट दुखणे, मलावरोध, जेवणानंतर मलप्रवृत्ती, पोटदुखी- आरोग्यवर्धिनी, त्रिफळाचूर्ण, प्रवाळपंचामृत, कुटजवटी. १२) आव रक्ती- कुटजवटी, कामदुधा, आरोग्यवर्धिनी, गंधर्व हरितकी. १३) आवाज बसणे, स्वरभंग, कोरडा खोकला- एलादिवटी. १४) आतडय़ांना पीळ बसणे- प्रवाळपंचामृत.
१५) इसब ओले, कोरडे- आरोग्यवर्धिनी, त्रिफळाचूर्ण, करंजेलतेल. १६) उचकी, हेटकी, हिक्का-मयूरापिच्छामशी, प्रवाळपंचामृत. १७) उदर-पोट मोठे होणे, जलोदर-आरोग्यवर्धिनी, लाह्य़ा. १८) उन्हाळी लागणे- गोक्षुरादि गुग्गुळ, साळीच्या लाह्य़ा, रसायनचूर्ण. १९) उसण भरणे, लचक भरणे, पाठदुखी, मान अवघडणे, कंबरदुखी- सिंहनाद गुग्गुळ, गोक्षुरादि गुग्गुळ, गंधर्व हरितकी, मनातेल, लेपगोळी. २०) उवा, लिखा, खवडे-आरोग्यवर्धिनी, त्रिपूर्ण, करंजेल+ कापूर.
२१) कफाचा ताप, मलेरिया, थंडी ताप, फ्ल्यू- त्रिभुवन कीर्ती, दमागोळी, ज्वरांकुश. २२) कर्णनाद, कानदुखी- आरोग्यवर्धिनी, मनातेल. २३) किरकिर (लहान बालकांची)- प्रवाळपंचामृत, मौक्तिकभस्म, सौम्य प्रमाणात त्रिफळाचूर्ण. २४) केसांच्या तक्रारी-आरोग्यवर्धिनी, रसायनचूर्ण. २५) केसतूड- आरोग्यवर्धिनी, एकादितेल, शतधौतधृत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २० डिसेंबर
१९०६ > निबंधकार, पत्रकार आणि ज्ञानदीप या मासिकांचे संस्थापक सदाशिव पांडुरंग केळकर यांचे निधन. मूर्तीपूजा आवश्यक आहे काय? आणि ग्रंथप्रामाण्य हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध.
१९२९> स्त्रीशिक्षण, आरोग्य आदी विषयांचे लेखक गोपाळ महादेव चिपळूणकर यांचे निधन. स्त्रीजीवनावर प्रकाश , सार्वजनिक शिक्षण व मोफत वाचनालये, शुद्धलेखनाचा राजमार्ग इ. पुस्तके प्रकाशित.
१९३३> भाषांतरकार विष्णू वामन बापट यांचे निधन. त्यांच्या नावावर ७० भाषांतरित ग्रंथ आहेत.
२००४> मराठी साहित्याचे दालन पोलीस कथांनी सजवणारे माजी पोलीस अधीक्षक वसंत कृष्ण जोशी यांचे निधन. अभूतपूर्व हत्या, गुन्ह्य़ाचा तपास आणि विज्ञान, गुन्हेगारीची नवी रूपे, पोलीस विज्ञानकथा असे त्यांचे २७ कथासंग्रह प्रसिद्ध.
२००९> लेखक, कवी, वक्ते आणि दलित नेते प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे यांचे निधन. रामायणातील सांस्कृतिक संघर्ष, धर्मातराची भीमगर्जना या त्यांच्या पुस्तकांतून दलित चळवळीचे प्रतिबिंब पहायला मिळते. काही नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
२०१०> ख्यातनाम साहित्यिक सुभाष भेंडे यांचे निधन.
– संजय वझरेकर