डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com सुरेशराव म्हणजे अतिउत्साही व्यक्तिमत्त्व. त्यांच्या डोक्यात लोककल्याणाच्या अनेक कल्पना उसळी मारीत असत. गावातली काही तरुण मुले मदतीला घेऊन आपले समाजकल्याणाचे काम ते करीत असत. ही कामे करण्याचा तसा त्यांचा हेतू काही वाईट नसे, पण ते राबवीत असलेल्या योजनांना तितका प्रतिसादही मिळत नसे. ही कामे आपल्या अंगावर घेऊन ते करीत असत आणि त्यांची बायको मात्र वैतागून जात असे. ‘‘तुम्हाला तुमच्या घरची कामे दिसत नाहीत. पण दारची कामे दिसतात. पुरे झालं तुमचं ‘अघोषित समाजकल्याण खातं’. घराकडे लक्ष द्या आता! आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी काही कराल की नाही? मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्याल तर त्यांची प्रगती तरी होईल. पण ते तुम्ही करणार नाही. कितीदा सांगितलं, पण पालथ्या घडय़ावर पाणी !’’ मग काय एकदा बायकोचे खडसावणे सुरू झाले की काही विचारू नका. आईही सुनेचीच री ओढणार! मग तिचीही सुरेशरावांची कानउघाडणी रीतसर सुरू होई!.. ‘‘अगं! कशाला बोलून आपला वेळ फुकट घालवतेस? त्याच्या वागण्यात काही बदल होणार नाही. आपण त्याच्या भल्यासाठी सांगतोय, पण त्याला ते रुचलं पाहिजे ना? त्याच्या या उतावळय़ा आणि चंचल स्वभावानेच हवे तसे यश मिळत नाही त्याला. त्याच्या हे कधी लक्षात येईल, तो सुदिन म्हणायचा. आपण आपलं सांगायचं काम करीत राहायचं.’’ जसजसा दोघींचा स्वर चढा लागायला लागे तसे मग त्याचे वडीलही या चर्चेत आपला सहभाग नोंदवत असत, ‘‘मी काय म्हणतो सुरेश! कोणतेही कार्य करावं, पण ते नियोजनबद्ध असावं असं आपलं मला वाटतं. नाही तर अपेक्षित यश हाती येत नाही आणि मग लोक म्हणायला मोकळे ‘गाडी ना घोडं अन् चालले तडतडं’.’’ ही म्हण माणसाच्या चंचल उतावळय़ा स्वभावावर नेमकेपणाने बोट ठेवते.