अन्न महामंडळाचा निर्वाळा; विद्यार्थ्यांना वाटप झाल्यानंतर समाजमाध्यमांवरून अफवांचे पीक पालघर: भारतीय खाद्य महामंडळामार्फत जिल्ह्यात शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारा तांदूळ हा पौष्टिक असल्याचे अन्न महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे या तांदळाला घेऊन समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अनेक अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण जिल्ह्यत वाटप केला जाणारा हा तांदूळ प्लास्टिक किंवा पोहे सदृश्य दिसत असला तरी तो चांगल्या प्रतीचा असून त्यात प्रथिने व पौष्टिकता असल्याचेही खाद्य निगममार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाटप केलेला तांदूळ प्लास्टिक सदृश्य असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या तांदळामध्ये लोह जीवनसत्त्वे आम्लयुक्त पदार्थ मिसळून तो एका विशिष्ट प्रक्रियामधून बाहेर पडत असल्याने या तांदळामध्ये पोषक घटके आहेत. विद्यार्थ्यांना या तांदळामधून पोषण मिळावे हा तांदूळ वाटप करण्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिला जाणारा तांदूळ पूर्णपणे सुरक्षित असून त्यात विविध पोषक घटके मिसळलेली असल्याचेही बोरीवली येथील भारतीय खाद्य निगमचे व्यवस्थापक यांनी सांगितले. मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात शालेय पोषण आहारात वाटप करण्यात आलेला तांदूळ प्लास्टिक सदृश्य तांदूळ असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण विभागामार्फत तो तांदूळ निगमकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर हा तांदूळ महामंडळाकडील साठय़ातला असून तो विद्यार्थ्यांना सुरक्षित व पोषक असल्याचे महामंडळाने शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे म्हटले आहे. पालघर जिल्ह्यत मोखाडा आणि विक्रमगड या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शालेय पोषण आहारात प्लास्टिक सदृश्य तांदूळ वाटप करण्यात आल्याची तक्रार नागरीक व पालकांनी केली होती. त्यामुळे जिल्ह्यत खळबळ उडाली होती. त्यानंतर तालुका प्रशासनाने सदरचा तांदूळ वाटप बंद करून विद्यार्थ्यांंना खाण्यास देऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या तांदुळाची तपासणी करण्यास भारतीय अन्न महामंडळाकडे जिल्हा परिषदेने पाठवला होता.