‘बायपास’ रस्त्याचा विस्तार पालघर: पालघर शहराला बायपास असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर सावरकर चौक या सुमारे सव्वादोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पालघर नवनगर येथे जिल्हा मुख्यालय सुरू झाल्याने पालघर- बोईसर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आगामी काळात प्रशासकीय कार्यालय इमारती कार्यरत झाल्यानंतर मुख्यालय संकुलात ४३ पेक्षा अधिक कार्यालयात सुरू होतील. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची संख्या काही पटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्तारुंदीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा मुख्यालय संकुल दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पावसाळा संपताच सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे असे सांगण्यात आले. या रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण या कामाच्या दरम्यान काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. पालघर शहराला बायपास ठरणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर सावरकर चौक हा सुमारे सव्वादोन दोन किलोमीटर लांबीचा रस्ता सध्या साडेसात मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण दोन टप्प्यात हाती घेण्याचे जिल्हा प्रशासनाने मंजूर केले आहे. या रुंदीकरणाच्या दरम्यान अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा तीन मीटरचे रुंदीकरण व त्या गटार व पदपथ उभारण्याचे प्रस्तावित आहे. रुंदीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचा एक किलोमीटर परिसरासाठी अडीच कोटी रुपये खर्च असून उर्वरित भागासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. याखेरीज पालघर शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या असून, यामुळे पालघरमधील रस्ते सुटसुटीत, मोकळे व अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवासाचा भुर्दंड पालघर स्थानकापासून जिल्हा मुख्यालय हे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी व जाण्यासाठी हवी तशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांना व नागरिकांना खासगी वाहतूक सेवा महागडी पडत आहे. यामुळे कोळगाव जिल्हा मुख्यालय ते पालघर रेल्वे स्थानक व बोईसर अशा एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी कर्मचारी व नागरीकांमार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा मुख्यालय हे पालघर रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाची रिंगरूट सेवा तसेच शेअर रिक्षा सेवा सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.