वाडा: मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिली असतानाच वाडा तालुक्यातील गौरापुर परिसरात काल (१५ मे) दुपारच्या सुमारास आलेल्या चक्रीसदृश वादळाने एकाच आदिवासी पाड्यातील जवळपास २० घरे उध्वस्त झाली आहेत.
६ मे व ७ मे या दोन दिवस सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे घरे, शेतकऱ्यांचे, वीट उत्पादकांचे व फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले असतानाच आता थेट चक्रीसदृश वादळाने गौरापुर वासियांना “जोर का झटका” दिला आहे.
१५ “मे” वाडा तालुक्यातील गौरापूर गावात दुपारी ३:३० वाजल्याच्या सुमारास अचानक आलेल्या या चक्रीसदृश्य वादळ व मुसळधार पावसाने लोंढारे पाड्यातील (आदिवासी पाड्यातील) २० कुटुंबियांच्या राहत्या घरांना मोठा फटका बसला आहे. वादळाने घरांवरील छप्परे जोरदार आरपार उडविले गेले, भिंती कोसळून पडल्या आहेत त्यामुळे घरांना छतच शिल्लक राहिलेले नाही. यात संसार उपयोगी वस्तुंची देखील मोठी हानी झाली आहे.
वातावरणात हवेचा दाब निर्माण होत चक्रीसदृश्य वादळ उठल्याने लोंढारे पाड्यातील नागरिक घरातच राहिले होते, मात्र जोराच्या चक्रीसदृश वादळाने पक्क्या घरांवरील छप्परे उडून भिंती कोसळू लागल्याने नागरिक भयभीत होत मुलांना घेऊन घराबाहेर पडल्याने जीव वाचला. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या वादळी वारा, पावसाने २० घरे पूर्णपणे उध्वस्त करून टाकली असुन पीडित कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घरे मागील वर्षी घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात आली होती. अशी माहिती गौरापूर गावातील नागरिक प्रकाश काळे यांनी दिली.
या आदिवासी कुटुंबियांच्या घरांची मोठी परझड झाल्याने त्यातच पावसाचे पुन्हा सावट असल्याने डोक्यावर छप्पर राहिले नसल्याने त्यांनी आता कुठे रहायचे व खायचे काय.? असा प्रश्न पडला असतानाच त्यांना आता मुला बाळांसहीत अक्षरशः उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
या अचानक उद्भवलेल्या चक्रीसदृश्य वादळाने २० घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना घडली असताना ही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी, ग्रामसेवक किंवा लोकप्रतिनिधी हे अद्याप पर्यंत पीडित कुटुंबीयांची भेटण्यासाठी पोहचले नाहीत. तसेच ग्रामसेवक भास्कर आंधळे यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन ही ते घटनास्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी प्रशासनाबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान घर परझड झालेल्यांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडून तातडीची मदतीसोबत घरांची दुरूस्ती व संसार उपयोगी वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रकाश काळे यांनी केली आहे.