डहाणू : डहाणू शहरातील मासोली संत रोहिदास नगरची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे गेले सात-आठ दिवसांपासून पाण्याची नासाडी होत आहे. तक्रार करूनही नगर परिषद त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. साखरा धरणातून डहाणू शहराला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे. सरावली जलशुद्धीकरण केंद्राच्या आधी सरावली तलावपाडा, रोहिदास नगर येथे मुख्य जलवाहिनीला काही भागात गळती लागली आहे. त्यामुळे रोहिदास नगर येथे मुख्य रस्त्यावर पाणी पसरून रस्ता चिखलमय झाला आहे. हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. असे येथील रहिवासी भूपेंद्र राऊत यांनी सांगितले आहे. याबाबत नगर परिषदेला विचारले असता पाणी गळतीची तात्काळ पाहणी करुन पाणी गळती थांबवण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या जातील असेही नगर परिषदेने म्हटले आहे.