पालघर: ६ मे पासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतीसह घराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानग्रस्त भागात पालकमंत्री पाहणी करण्यासाठी अद्याप फिरकले नाहीत. मात्र नवी मुंबई येथून भाजप पक्षाने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेकरिता पालघर येथे उपस्थित राहिल्यामुळे ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिकांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज पालघर येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा चौक ते जुना पालघर श्री हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेत पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहा व सात मे रोजी जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार या ग्रामीण भागासह पालघर, बोईसर, वसई या शहरी भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यावेळी वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरे उडून गेली, डहाणू येथे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांच्या बोटीचे नुकसान, उन्हाळी भात शेतीसह फळबागांचे नुकसान, वीटभट्टीचे व मिठागराचे नुकसान तसेच घरकुलासाठी निधी येण्यास सुरुवात झाली असून घर बांधणीकरिता मागविलेले साहित्य देखील या पावसात भिजून खराब झाले आहेत. यासह सुकी मासळी विक्रेते व अनेक नागरिकांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे अद्याप पर्यंत सुरू आहेत. मात्र असे असले तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता फिरकले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत मोखाडा व इतर काही भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले होते. तेव्हा जिल्हा प्रशासन हजर होण्याअगोदर पालकमंत्री रवींद्र चव्हाण तेथे हजर झाले होते. मात्र गणेश नाईक यांच्या कारकिर्दीत नुकसान होऊन दहा दिवस उलटले असून देखील दोन तास खर्च करून वाडा, विक्रमगड या भागात पाहणी करिता गेले नसल्याचे दिसून येत आहे.

याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विचारणा केली असता नागरिकांनी संताप करण्याची गरज नाही. घटना घडल्यानंतर त्वरित जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या मदतीकरिता पंचनामे करण्यास सांगितले होते. गरज पडल्यास सीएसआर फंडामधून देखील मदत देऊ असे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. तसेच अडचणीच्या वेळी नागरिकांच्या पाठीमागे ताकदीने उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुख्य रस्त्याची वाहतूक एक तास खोळंबली

हुतात्मा चौक येथून ११.२० वाजता सुरू झालेल्या तिरंगा रॅलीमुळे जुना पालघर ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन ते हुतात्मा चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून इतर मार्गावरून वाहतूक पळवण्यात आली होती. जुना पालघर येथे रॅलीची समाप्ती झाल्यानंतर देखील जवळपास एक वाजेपर्यंत पालघर रेल्वे स्टेशन ते जुना पालघर रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. एक वाजता नंतर वाहतूक पूर्वपथावर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैनिकांचे कौतुक

पालघर येथील हुतात्मा चौकात पालकमंत्री यांनी हुतात्म्यांना वंदन करून तिरंगा रॅलीला सुरुवात केली. पालघर रेल्वे स्टेशन परिसरातून रॅली जुना पालघर पर्यंत नेण्यात आली. तेथे पहलगाम येथील हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना व दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानसोबत लढत आतंकवाद्यांचे तळ उध्वस्त करून आतंकवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल सैनिकांचे विशेष कौतुक करण्यात आले.