आठवडय़ाची मुलाखत : निकीत सुर्वे, वन्यजीव संशोधक

मुंबईसारख्या शहरांमध्ये होणारी विकासकामे, वाढती मानवी वस्ती आणि त्यातून प्राण्यांच्या अधिवासावर होणारे अतिक्रमण, जंगलतोड यामुळे अलीकडच्या काळात मानव-प्राणी यांच्यात संघर्ष दिसून येत आहे; मात्र मुंबई आणि परिसरातील जंगलपट्टय़ात राहणाऱ्या वारली आणि इतर जमातींचे नागरिक वाघासारख्या हिंस्र प्राण्याला आपला रक्षणकर्ता मानतात. त्यांच्या गावांमध्ये असलेल्या १५० वाघोबा मंदिरांचा अभ्यासपूर्ण अहवाल नुकताच काही वन्यजीव संशोधकांनी तयार के ला. हे असे सहजीवन शक्य असेल तर मानव-प्राणी संघर्ष का उद्भवतो व तो कसा टाळावा याविषयी.

वाघोबा मंदिरांचा अभ्यास का करावासा वाटला?

वाघोबा मंदिरे फार पूर्वीपासून आहेत. त्यांचा याआधीही अभ्यास झाला आहे; पण एका बाजूला वारंवार मानव-प्राणी संघर्ष उद्भवत असताना मानवाचीच एक जमात वाघांना पुजते आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. या दृष्टीने या वाघोबा मंदिरांचे दस्तावेजीकरण करण्यात आले. वाघ म्हटला की के वळ भीती, राग याच भावना मानवी मनात उत्पन्न होत असताना या हिंस्र प्राण्याशी असलेले माणसाचे एक वेगळे नाते यानिमित्ताने समोर आले.

मानव-प्राणी संघर्ष का निर्माण होतो?

जेव्हा माणसाला माहीत असते की, एखाद्या ठिकाणी वाघ आहे आणि वाघाला माहीत असते की, त्या ठिकाणी माणूस आहे तेव्हा हा संघर्ष होत नाही. जेव्हा हे दोघेही एकमेकांच्या समोर अचानक येतात तेव्हा हा संघर्ष होतो. दोघेही एकाच ठिकाणी अडकू न पडले असतील आणि वाघाला माणसापासून काही धोका वाटला तरच तो हल्ला करतो. लोक शौचास गेलेले असताना बसलेल्या अवस्थेत झालेले हल्ले हे अचानक झालेले असतात. तेव्हा वाघाला माणूस एखाद्या प्राण्यासारखा वाटतो. अनेकदा लहान मुले सतर्क  नसल्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतात. काही हल्ले हे जीवघेणे हल्ले असतात. एखाद्या वाघाला काही कारणास्तव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडल्यास त्यांची जीवनशैली विस्कळीत होते. शिवाय तेथे स्थानिक वाघही असतात. त्यामुळे नव्या ठिकाणी जुळवून घेण्यात वाघाला अडचण येऊ शकते; मात्र वाघ जीवघेणे हल्ले का करतात याविषयी अभ्यास सुरू आहे. आदिवासींना याविषयी विचारले असता, ‘ते आमचे वाघ नाहीत, वेगळे वाघ आहेत,’ असे उत्तर त्यांनी दिले.

वाघ किं वा बिबटय़ा समोर आल्यास माणसाची प्रतिक्रिया काय असायला हवी?

जोपर्यंत माणूस वाघाची वाट अडवत नाही तोपर्यंत वाघ हल्ला करणार नाही. मध्यंतरी बिंबिसारनगरमध्ये बिबटय़ा शिरला होता तेव्हा तेथील दूधवाला कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेला. तेव्हा बिबटय़ाही त्याच्या मार्गाने शांतपणे निघून गेला. बिबटय़ा अचानक समोर आल्यास पळून जाऊ नये. खाली बसू नये. त्याच्यापेक्षा मोठे दिसण्याचा प्रयत्न करावा. हात वर करावेत.

बिबटय़ाशिवाय आणखी कोणत्या प्राण्यांसोबत माणसाचा संघर्ष उद्भवतो?

अस्वल, हत्ती, गवा, रानडुक्कर असे प्राणी बऱ्याचदा शेतीचे नुकसान करत असल्यामुळे संघर्ष उद्भवतो. मुंबईत बऱ्याचदा माकडांनी त्रास दिल्याच्या तक्रारी येतात.

मानव-प्राणी यांचे सहजीवन म्हणजे नेमके  काय? ते कसे शक्य आहे?

आपल्या घराच्या खिडकीत चिमण्या किं वा कबुतरे येतात. हेसुद्धा एक प्रकारचे सहजीवनच आहे. जंगलांमध्ये बिबटय़ांनी के लेले हल्ले हे बऱ्याचदा तेथे अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांवर झालेले असतात. जे आदिवासी पूर्वापार जंगलात राहत आले आहेत त्यांना बिबटय़ांसोबत राहण्याची सवय असते. मुंबईत राहणाऱ्या माणसाला जसे ट्रेन कशी पकडायची हे माहीत असते तसेच जंगलात राहणाऱ्यांना बिबटय़ाशी कसे वागावे हे माहीत असते. बिबटय़ा का येतो, कधी येतो हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे तो येईल अशा गोष्टी ते करत नाहीत. माणसाच्या कृतीमुळे प्राण्याला आणि प्राण्याच्या कृतीमुळे माणसाला त्रास होत नाही तेव्हा ते सहजीवन असते. आपल्या परिसरात कचरा पडलेला असल्यास तेथे येणारे कु त्रे, मांजरी हे बिबटय़ांचे खाद्य आहे. त्यामागोमाग बिबटे मानवी वस्तीत येतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा.

मानवी-प्राणी सहजीवनाबाबत समाजशिक्षण कसे करता येईल?

मी शाळेत असताना दरवर्षी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त आमची सहल जायची. अशा प्रकारे मुलांना बाहेरच्या वातावरणात नेले पाहिजे. वाचनाची सवय लावली पाहिजे. पाणी कु ठून येते, पिके  कु ठून येतात हे त्यांना माहीत असले पाहिजे. लहान मुलांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. आम्हीही शाळांमध्ये जाऊन जनजागृती करत असतो.

मुलाखत – नमिता धुरी