डहाणू : तलासरी तालुक्यातील उपलाट येथे एका व्यक्तीकडून गेल्या २० वर्षांपासून मान्यता प्राप्त पदवी नसताना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर वर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र गेल्या २० वर्षांपासून बोगस दवाखाना सुरू असताना आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

तलासरी तालुक्यातील उपलाट कलबटपाडा येथे अखिलेश पटेल (४५) हा इलेक्ट्रोपॅथी पदविका वैद्यकीय प्रमाणपत्र धारक गेल्या २० वर्षांपासून दवाखाना चालवत असून रुग्णांना एलिओपॅथिक औषधे देऊन उपचार करत असल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. तालुका वैद्यकीय अधिकारी यशवंत कोळी व त्यांच्या पथका मार्फत बोगस डॉक्टर शोध समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता आरोपीत यांच्याकडे बी.ई.एम.एस. इलेक्ट्रोपॅथी पदवी असताना त्यांच्या ओमसाई क्लिनिक दवाखान्यात ऍलोपॅथिक औषधे मिळून आली आहेत. इलेक्ट्रोपॅथी प्रमाणपत्र धारक व्यक्तीला ऍलोपॅथिक औषधे देण्याचा अधिकार नसताना आरोपित हा इलेक्ट्रोपॅथी प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांना एलिओपॅथी औषधे देऊन उपचार करीत असल्याचे आढळून आले. तसेच मोठ्या प्रमाणात एलिओपॅथिक औषधांचा साठा मिळून आल्यामुळे तालुका आरोग्य विभागाकडून डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : डहाणू : तीन राज्यांतील मच्छीमारांनी मिळून स्थापन केली इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशन

अखिलेश पटेल यांच्या विरुद्ध तलासरी पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक व वैद्यकीय व्यवहार अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तलासरी तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम हाती घेणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यशवंत कोळी यांनी दिली आहे. तसेच त्यांनी बोगस डॉक्टरांसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून उपलाट येथे डॉक्टर कडून रुग्णांवर चुकीचे उपचार होत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर आरोग्य विभाग अश्या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचे आरोप जाणकारांकडून केले जात आहेत.

हेही वाचा : तारापूर येथे कामगाराचा मृत्यू, प्रकरण संशयास्पद असल्याचा कुटबियांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून अनेक ठिकाणी डॉक्टरांकडून रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगीत दिली आहे. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना याची कल्पना नसल्यामुळे लोक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असून डॉक्टर देखील पैश्याच्या हव्यासापोटी जमेल तसे उपचार रुग्णांवर करत असून रुग्णाची प्रकृती खालावल्यास त्यांना इतर रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला अश्या डॉक्टरांकडून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.