वाडा : कुयलू- तोरणे येथील शिवकृपा लोखंड कंपनीतून प्रदूषण होत असताना देखील ग्रामसभेच्या शासकीय दस्तऐवजात (प्रोसिडिंग) हेराफेरी करून ग्रामस्थ व शासनाची दिशाभूल करत बनावट ठराव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घडलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची भेट घेत बनावट ठराव घेणाऱ्या ग्रामसेविकासहित दोषींवर कारवाई तर प्रदूषणकारी कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.

वाडा तालुक्यातील कुयलु – तोरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शिवकृपा स्टील अ‍ॅन्ड अ‍ॅलॉईज या लोखंड उत्पादक कंपनीकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी, वायु व जल प्रदूषणाने येथील नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काहींना दमा, श्वसनाचे व कातडीचे आजार उद्भवण्यास सुरुवात झाली असल्याचे महिलांनी सांगितले.

शिवकृपा कंपनीलगत अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना या कंपनीतील प्रदूषणाचा मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या जीवघेण्या प्रदूषणकारी कंपनीवर ठोस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

मागील तीन ते चार वर्षांपासून शिवकृपा स्टील कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाकडे ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी व पत्रव्यवहार करूनही त्यावर कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे सुरेश मोकाशी व विठ्ठल गोरे या ग्रामस्थांनी सांगितले.

एप्रिल २०२२ मध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला बंदचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा ह्या कंपनीने अवघ्या दोन दिवसांतच कंपनी पुन्हा चालु करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विनंती अर्ज केल्याने कंपनीला दिलेल्या चार नोटीसांची सर्व पूर्ती केल्यानंतर कंपनी पुन्हा सुरू करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयातून परवानगी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान या शिवकृपा कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांच्या पुन्हा तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वाढल्याने २०२४ मध्ये या कंपनीला प्रस्तावित निर्देश व अंतरीम निर्देश यांची नोटीस देत पाहणी अहवाल केला होता. मात्र तरी देखील या कंपनीचे प्रदूषण सुरूच राहिले.

या शिवकृपा कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित करत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आणि कंपनीचे आर्थिक हितसंबंध आहेत का.? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी प्रदूषणकारी शिवकृपा कंपनीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत शिष्टमंडळानी कल्याण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांची वाडा गटविकास अधिकारी वैभव शिंदे व ग्रामस्थांची आणि ग्रामस्थांच्या लढ्यात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते ॲड.राहुल ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा घडवून आणली.

मात्र, यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शिवकृपा या प्रदूषणकारी कंपनीवर कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कंपनीवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन नक्की काय.? भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याच शिवकृपा कंपनीच्या प्रदूषणाबाबत कुयलु ग्रामपंचायतीमध्ये १८ मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या प्रोसिडींगमध्ये हेराफेरी करून बनावट ठराव (न घेतलेला ठराव) घेतला असल्याचे उघड झाले आहे.

ग्रामसभेत विषय क्रमांक (६) सहामध्ये ग्रामस्थांकडून चार कामे सुचविण्यात आली होती. यामधील विषय क्रमांक ६ मधील दोन मध्ये कुयलु – भुरकूड पाडा बोअरवेल पाईप बदल करणे असा विषय होता. मात्र त्याचा ठराव घेताना त्या जागी हेराफेरी करत शिवकृपा प्रा. लि कंपनीकडून कोणतेही प्रदूषण होत नसुन ध्वनी, वायू प्रदूषण व सांडपाणी व्यवस्थापन हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम व अटीशर्तीचे तंतोतंत पालन होत आहे. याबाबत कोणाचीही हरकत, तक्रार नसल्याने ग्रामसभेत आक्षेप नाही असा उपसरपंच ज्ञानेश्वर वेखंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा बनावट ठराव सर्वानुमते मंजुर केला आहे. यावर काही ग्रामस्थांची नावे आढळून आली आहेत.

तसेच याआधी देखील वेगवेगळे ठराव घेऊन त्यावर सुचक व अनुमोदक यांचे नाव व सही नसताना ते ठराव मंजूर केलेले असल्याचे निर्दशनास आले आहेत. ग्रामस्थांनी हा प्रकार माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे मागिवली असताना उघडकीस आणला आहे.

मी नवीन ग्रामपंचायत अधिकारी असल्यामुळे मला माहिती नव्हती, काही व्यक्तींनी शिवकृपा कंपनीकडून कुठलेही प्रदूषण होत नसल्याचा ठराव लिहिण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. त्यामुळे कंपनीच्या बाजूने ठराव लिहिला असल्याचे कूयलू ग्रामपंचायत अधिकारी अंकिता किशोर सुतार यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी खुलासा सादर केला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी हा खुलासा केवळ स्वतःला वाचविण्याची पळवाट असल्याचे सांगुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

कुयलु ग्रामपंचायत अधिकारी यांची चौकशी सुरू असून पुढील कारवाईचा प्रस्ताव पालघर जिल्हा परिषदेला पाठविला जाईल. – वैभव शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वाडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शिवकृपा कंपनीला प्रदूषण रोखण्याबाबत निर्देश देत एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तसेच वायु प्रदूषण नियंत्रण प्रणाली क्षमतेबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. – डॉ.सीमा दळवी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण