बोईसर: पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या ४५ गावांना नववर्षांत शुद्ध पाणी मिळणार आहे. एमएमआरडीएच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जलजोडणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. नवीन वर्षांत या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पाण्यासाठी होणाऱ्या यातनेतून सुटका करावी अशी अपेक्षा या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी अडचणी येत आहेत. अशा जलस्रोत उपलब्ध नसलेल्या ७६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी एमएमआरडीएच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने एमएमआरडीएकडे करण्यात आली होती. ७६ गावांतील एक ते दीड लाख लोकसंख्येला दररोजची २२.२३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष वेधले होते. गरज लक्षात घेऊन सध्या तरी एमएमआरडीएकडून ४५ गावांना पाणीपुरवठा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित ३१ गावे एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंजुरी देण्यात आलेल्या ४५ गावांची सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. प्रतिदिन या गावांना १४.४८ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या गावांमधील पाण्याच्या साठय़ाबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून पाहणी करण्यात आली आहे. अहवालानुसार उर्वरित ३१ गावांमध्ये भूजलावर आधारित पाणीपुरवठा योजना राबविणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. भूतलावरील पुरेसे व जवळच्या अंतरावर पाणीसाठे उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे सांगण्यात येते. दरम्यान एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणी मिळाल्याने वीज बिलाची रक्कम आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. दरम्यान, १५ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाअंतर्गत ४५ गावांना जलजोडणीसाठी मंजुरी दिली आहे. अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित गावांसाठी जलजोडणी देण्यात येईल, असे एमएमआरडीए कार्यकारी अभियंता हनुमंत सोनावणे यांनी सांगितले. योजनेचे काम प्रगतिपथावर एमएमआरडीएच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पालघर जिल्ह्यात प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी डहाणू, पालघर आणि वसई तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भाग आणि वसई, विरार महानगर पालिका क्षेत्रातून जात आहे. योजनेची जलवाहिनी वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील ७६ गावांच्या हद्दीतून जात आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शाश्वत आणि पुरेसा पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत एमएमआरडीएने दिलेल्या आश्वासनानुसार महामार्गालगतच्या गावांना जलजोडणी दिली पाहिजे. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. - अविनाश पाटील, सदस्य, आदिवासी पुनर्वसन आंदोलन