पालघर : विधानसभा क्षेत्रातील समस्या तालुकास्तरावर सोडविण्याचा प्रयत्न पालघर व बोईसर विधानसभा क्षेत्रातील आमदार यांनी पालघर येथे “आमदार आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या पर्यायी जनता दरबारात २२२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी काही ना तात्काळ सोडवण्यात यश आले असून उर्वरित प्राप्त तक्रारी १५ दिवसात सोडविण्यात याव्यात अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.
पालघरचे आमदार राजेंद्र गावित तसेच बोईसर चे आमदार विलास तरे या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी पालघर तहसील कार्यालयाच्या सभागृहात त्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर “आमदार आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.
“हर घर जल” या पंतप्रधान यांच्या महत्त्वकांक्षी योजने मधून उभारण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्यात झालेली दिरंगाई व झालेल्या कामाचा दर्जा बाबत दोनही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच ज्या टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही अशा ठिकाणी कुपनलिका खोदून देण्यात याव्यात असे याप्रसंगी सांगण्यात आले. बाडापोखरण व २६ गावच्या नळपाणी योजनेत धाकटी डहाणू भागात पाणी पोहोचत नसल्याने चंडीगाव ते धाकटी डहाणू पर्यंत सुमारे १० कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करावे असे सुचित करण्यात आले. तसेच पालघर शहर व २६ गावच्या नळ पाणी योजनेअंतर्गत पडघा, उमरोळी व आगवन येथे पुरेशा दाबाने पुरवठा होत नसल्याने त्या संदर्भात आवश्यक दुरुस्ती व बदल जून महिन्याच्या अखेर पर्यंत कामं पूर्ण करण्यात यावी असे संबंधित अधिकारी वर्गाला सुचित करण्यात आले.
सूर्या पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये असणाऱ्या गळतीमुळे काव्याच्या अखेरच्या टोकापर्यंत पाणी पोहोचता यावे यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या वर्षी शेलवाली पर्यंत कालव्याचे पाणी पोहोचले असून महिन्याभराच्या कालावधी उर्वरित कालव्याची दुरुस्ती पूर्ण करून कमारे गावापर्यंत पाणी पोहोचवून नंतर ते पाणी पाणेरी ओहळ्यात सोडण्यात येईल असे आमदार राजेंद्र गावित यांनी या प्रसंगी सांगितले.
इतर काही झालेले निर्णय
जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते चिंतुपाडा या सुमारे ३५० लिटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण एमएमआरडीए च्या मार्फत करण्यात येणार असून या कामाचे कार्यालय निर्गमित करण्यात आले आहे.
पालघर पूर्वेकडे असणाऱ्या एका प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश
सालवड गावाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संदर्भात उद्योग मंत्री यांच्या समवेत बैठक
पालघर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी परिवहन, पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक
किनारपट्टीच्या गावांच्या सीमांकनासाठी उपक्रमाला आरंभ
माहीम रोहिदास नगर, वेंगणी व वडराई मच्छिमार सोसायटी येथे समाज मंदिर उभारण्यासाठी निधीची मंजुरी.
मत्तबगार मंडळी विरुद्ध कारवाई करण्याची हिम्मत आहे काय ?
खारफुटी विभागा च्या ताब्यातील जागेत तारापूर ग्रामपंचायत मार्फत घरगुती घनकचरा टाकत असल्याने ग्रामपंचायतीची एक घंटागाडी तीन महिन्यापूर्वी पासून ताब्यात घेऊन ठेवली होती. ही गाडी सोडवण्यासाठी आमदार महोदयांनी मध्यस्थी करत ग्रामपंचायत खारफुटी विभागाला हमीपत्र लिहून द्यायचे असे निश्चित झाले. आमदार यांनी या विभागाने तात्काळ घंटागाडी सोडण्यासाठी सूचना दिल्या.खारफुटी विभागाच्या आडमुठ्या धोरणाबाबत टीका करताना वसई तालुक्यात १२ किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात तिवरींची कत्तल झाली असून मत्तबगार मंडळी विरुद्ध कारवाई करणार का असा सवाल आमदार राजेंद्र गावित यांनी खारफुटी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. तारापूर येथे घंटागाडी पकडलेल्या ठिकाणाचा भूमीअभिलेख विभागाने पाहणी करून क्षेत्र निश्चिती करून घ्यावी असे सुचित करताना वादीत क्षेत्र खारफुटी विभागाच्या अख्याती मध्ये नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू असा सज्जड दम आमदार राजेंद्र गावित यांनी भरला.
व्यासपीठावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मंदीआळी
शिवसेनेच्या दोन्ही आमदारांसोबत शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या उपनेत्या, महिला आघाडी जिल्हा संघटक, प्रवक्ते व इतर शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते. तक्रार घेऊन येणाऱ्या मंडळींची बाजू ही मंडळी लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गांसमोर मांडत असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला भाजपा च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचे दिसून आले.