पालघर : पालघर पूर्वेकडील घोलवीरा परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी नाल्यातून गेली आहे. पावसाळ्यात ही पाईपलाईन खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असून नाल्यातील सांडपाण्यात वास्तव्य असलेल्या या पाईप मधून अशुद्ध पाणीपुरवठा या भागात होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती कायम असून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पालघर नगरपरिषद व इतर २६ गावांना प्रादेशिक नळ पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पालघर पूर्वेकडील घोलविरा व इतर भागांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी या भागात असलेल्या नाल्यातून गेली आहे. घोलविरा परिसरात असलेला हा मुख्य नाला असून वेवूर, मोरवाली, अंबाडी रोड, हनुमान टेकडी, जांभूळ पाडा, डुंगीपाडा असा प्रवास करत हा नाला रेल्वे लाईनला जाऊन मिळतो. अनेक गावपाड्यांचे पाणी वाहून नेणाऱ्या या नाल्याला इतर तीन मुख्य नाले मिळत असल्याने पावसाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ साचत असतो.
याच नाल्याच्या एका बाजूने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली आहे. या पाईप मधून पालघर पूर्वेच्या अनेक परिसरात पिण्याचे पाणी पुरवले जाते. पावसाळ्या दरम्यान नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आल्याने पाणी तुंबून अशावेळी पाईपमध्ये दूषित, घाण पाणी जात असल्याने येथील परिसरातील नागरिकांच्या अनेक वेळा दूषित पाण्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मागील वर्षी पावसाळ्या दरम्यान या नाल्यातील पाईपलाईन फुटण्याचे प्रकार अनेकदा घडले होते.
याबाबत मागील वर्षी नगर परिषदेकडे तक्रार केली असता जलवाहिनीचा पाईप वाकलेला असल्याने तसेच दोन पाईप जोडण्याच्या जागी असलेली रबर रिंग घट्ट न बसल्याने ही पाण्याची नासाडी होत असून लवकरच या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच पुन्हा ही समस्या निर्माण होऊ नये याकरिता त्या पाईपच्या बाजूला काँक्रीट करण्याचा विचार असल्याचे नगर परिषदेने सांगितले होते. मात्र वर्ष उलटून देखील पुन्हा पावसाळा सुरू होत असताना ही स्थिती कायम असल्याने या भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता लवकरच या जलवाहिनीला काँक्रीट करून बंदिस्त केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
जलवाहिनीमुळे आरोग्याच्या समस्या
नाल्यातील जलवाहिनी अनेकदा फुटून त्यामधून दूषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे तेच पाणी पिण्यात येत असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. याशिवाय नाल्यात साचलेला गाळ, कचरा व हिरवळ मुळे येथील परिसरात डासांचा उपद्रव वाढला असून याबाबत नगर परिषदेकडे अनेकदा तक्रार करून देखील कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
रस्ता रुंदीकरण मात्र पाईपलाईन नाल्यातच
नाल्यामध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन उंचावर घेण्याकरिता मागील वर्षी तत्कालीन नगरसेवक यांच्याकडे विचारणा केली असता 30 मीटर पर्यंत रस्ता रुंदीकरण करताना पाईपलाईन रस्त्याच्या बरोबरीने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या भागातील रस्त्याच्या रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यापासून सुरू असून आता पूर्ण झाले आहे. असे असताना देखील पाईपलाईन मध्ये काहीच सुधारणा न केल्याने याचा त्रास यंदाच्या पावसाळ्यात देखील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.