पालघर : पालघर जिल्ह्यात रोज सहा ते सात जणांना सर्पदंश होत असल्याचे आढळून आले आहे.मागील १२ महिन्यांत जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात २५१९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद झाली आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागांत सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला सुद्धा वेग आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे तसेच पावसाचे पाणी बिळात गेल्यामुळे मे ते सप्टेंबर या महिन्यांच्या काळात सापाला बिळाबाहेर सुरक्षित ठिकाणी निघावे लागते. त्यामुळे सर्वाधिक सर्पदंश या पाच महिन्यात होत असल्याचे दिसून येते. सर्पदंशाच्या बहुतेक घटनांमध्ये बिनविषारी सर्पदंश अधिक आहेत, विषारी सर्पाकडून दंश झाला तरी, वेळेत उपचार मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही मृत्यू झाला नसल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १६०९ रुग्णांना सर्पदंश झाला आहे. तर एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या १२ महिन्यांमध्ये २५१९ सर्पदंशाचे रुग्ण आढळून आले. सर्वाधिक रुग्णांची नोंद ही जव्हार उपजिल्हा रुग्णालयात ३७३ व वाडा ग्रामीण रुग्णालयावर ३६७ इतकी आहे. त्यापाठोपाठ तलासरी ग्रामीण रुग्णालय ३११, कासा व डहाणू उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. सर्वात कमी सर्पदंशाची नोंद विरार, वाणगांव व बोईसर ग्रामीण रुग्णालयात झाली आहे. सर्प म्हटल्यावर लोकांच्या मनात भीती निर्माण होत असल्याने सापाला मारून टाकण्याचे प्रकार सतत घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी सर्प लोकवस्तीमध्ये आढळल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लशींचा साठा उपलब्ध
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मुबलक प्रमाणात सर्पदंश लशींचा साठा उपलब्ध आहे. सर्प विषारी की बिनविषारी याची योग्य तपासणी केल्यानंतर रुग्णालयाला औषध पुरविले जाते. विषारी सर्पदंश रुग्णालाच ती लस दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रांना पावसाळ्यापूर्वी लशींचे वाटप पूर्ण झाले असून १४७४ लशी उपलब्ध आहे, अशी माहिती औषध निर्माण अधिकारी डॉ. दत्तात्रय भांड यांनी दिली.
‘सावधगिरी बाळगा’
जिल्ह्यात विशेषकरून पावसाळयात सर्पदंश होतात. शेतात काम करताना सुरक्षित साधनांचा वापर करावा. गमबुट वापरावे, घराच्या आजूबाजूचा कचरा तसेच अडगळ काढावी. एखादा साप चावल्यास घरीच उपचार न करता जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, सर्प चावलेल्या जागेपासून काही अंतरावर घट्ट पट्टी बांधावी. योग्य औषधोपचार घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी केले आहे.
रुग्णांना तत्काळ उपचार आवश्यक
विषारी सापाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत या कारणास्तव सर्पदंश रुग्णांना अनेक वेळा खासगी रुग्णालयात किंवा जिल्ह्याबाहेर उपचारासाठी न्यावे लागत. यातच अनेक वेळा रुग्ण दगावण्याचे शक्यता असते.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ रुग्ण
रुग्णालय | मासिक | वर्षभरात |
उपजिल्हा डहाणू | २ | २३५ |
उपजिल्हा कासा | ६ | २७५ |
ग्रामीण वाणगाव | ४ | ७१ |
ग्रामीण पालघर | २ | १०६ |
ग्रामीण मनोर | १३ | २९० |
ग्रामीण बोईसर | ५ | ९२ |
उपजिल्हा जव्हार | १५ | ३७३ |
ग्रामीण विक्रमगड | ६ | १८८ |
ग्रामीण तलासरी | १६ | ३११ |
ग्रामीण विरार | ० | २९ |
ग्रामीण वाडा | १७ | ३६७ |
ग्रामीण मोखाडा | १ | १८२ |
एकूण | ८७ | २५१९ |