पुलाला भगदाड, लोखंडी सळ्या बाहेर; प्रशासनाचे दुर्लक्ष
डहाणू : निकणेजवळील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले असून, हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या मध्यभागी रस्त्यावरील लोखंडी अँगल आणि सळ्या बाहेर आल्या आहेत. गावातून जाण्या-येण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
निकणे या गावात जाणारा हाच एकमेव पूल असून ग्रामपंचायतीचे देसकपाडा, इभाडपाडा, कातकरीपाडा, गाठणपाडा, सुतारपाडा, घाटालपाडा, हाडलपाडा, सगणेपाडा आदि ८ पाडे या पुलामुळे जोडले गेले आहेत. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली गेल्यावर गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पूल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
डहाणू-नाशिक राज्य मार्गावर वधनाहून निकणे येथे जाताना सुसरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. निकणे गावाला जोडणारा हा एकमेव पूल असून त्याची पुरती दुरवस्था आहे. खराब पुलामुळे रात्री-अपरात्री या पुलावरून येण्यास रिक्षा चालकांचीही नकारघंटा असते. वाहनाचा तोल जाऊन वाहन नदीत कोसळण्याची दाट शक्यता आहे. या गावाची तब्बल अडीच हजारहून लोकसंख्या असून पुलावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी यावरूनच ये-जा करतात. रिक्षा, दुचाकी, ट्रक या मोठय़ा प्रमाणात पुलावरून ये-जा करीत असतात. या पुलाला पावसाच्या पुराचा सततचा मारा बसत असल्याने तो धोकादायक बनला आहे.
पुराच्या वेळी संपर्क तुटल्यास रणकोळ गावातून वळसा घालून कासा अथवा वाणगाव येथे जाता येत असल्याचे किसन चव्हाण या ग्रामस्थाने सांगितले. पण नवीन पूल कधी बांधणार याबाबत प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नाही. निकणे येथे नवीन पूल बांधण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत. जुना पूल तोडून नवीन पूल बांधण्याची ग्रामपंचायतीची मागणी केल्याचे माजी सरपंच सायवन माधव देसक यांचे म्हणणे आहे.