वाडा : अवकाळी पावसामुळे एकीकडे घरांची पडझड आणि फळबागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाच दुसरीकडे खरीप हंगामातील भातशेती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे,कारण गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वळवामुळे खरीप हंगामासाठी शेती तयार करण्याचे कामाचे वेळापत्रक खोळंबले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.रब्बी हंगामानंतर जुन महिन्यात खरीप हंगाम सुरू होतो, मात्र रब्बी हंगामातील पिके अखेरच्या काढणीच्या टप्प्यात असतानाच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार एप्रिलच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस पडत राहिल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्व तयारी व शेतीची मशागत करण्यासाठी पुरेशी वेळ दिली नाही. याचाच फटका हा खरीप हंगामातील भात पिकांना मोठा बसणार असल्याचे वर्तविले जात आहे.

जून महिन्यात येणारा मान्सून दाखल होण्यापूर्वीच पावसाने जवळपास दीड महिन्यापासून आधीच हजेरी लावली आहे. हा पाऊस सातत्याने मागील १५ दिवसांपासून पडत असल्याने शेतकरी पाऊस आला म्हणून खरीप हंगामातील भात शेतीच्या तयारीला लागला होता. मात्र अधूनमधून येणारा पाऊस हा भात लागवडीसाठी पोषक वातावरण नसल्याने कोरड पेरणी होऊ शकलेली नाही. यापुढे असाच पाऊस चालू राहिल्यास २५ जुन पर्यंत पेरणी होऊ शकणार नसल्याने हळवे व गरवे भाताची मोठी पंचायत होणार आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी संकटदायक ठरणार आल्याने शेतकऱ्यांना शासनाने अधिकाधिक मदत करावी असे घोडमाळ येथील प्रगतशील शेतकरी मधुकर काशिनाथ सांबरे यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेतीची लागवड केली जाते. वाडा तालुक्यात सुमारे १४ हजार ५०० हेक्टर तर विक्रमगड तालुक्यात साधारण ८ हजार हेक्टर खरीप पीक लागवडीखाली क्षेत्र आहे. वसई, पालघर व डहाणू या तालुक्यात देखील खरीप हंगामात भातशेती मुख्यत्वे: केली जाते.

शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा करीत होते. एप्रिल महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. मधल्या काळात पाऊस थांबला देखील होता. मात्र ७ “मे” पासून पुन्हा पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मान्सूनचा पाऊस हा एक  महिना आधीच दाखल झाला आहे का.? असा प्रश्न बळीराजाला पडला होता. त्यामुळे शेती, खरीप हंगामाची व इतर घरगुती कामे उरकून घेण्याची पूर्व तयारी झाली नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, वसई तालुक्यांतील मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने शेतकऱ्यांना भात शेतीची पूर्व मशागत करण्याची संधी मिळालेली नाही. काही शेतकरी भातशेतीचे माध्यमातून चांगल्या प्रकारे उत्पादन यावे यासाठी उन्हाळ्यात “मे” महिन्यात शेतीची नांगरणी किंवा उखळणी करून मशागत करतात. पाऊस पडताच वाफसा पद्धतीने भाताची “बी” लागवड करतात. भात पिकाला उगवणीसाठी उबदार परिस्थिती आणि वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते सोबतच त्याच्या वाढीसाठी उष्ण हवामान आणि पाणी आवश्यक असते.

वाफसा म्हणजे काय-

वाफसा म्हणजे जमिनीतील हवा खेळती राहते आणि पाणी योग्य प्रमाणात धारण करते. योग्य वेळी वाफसा केल्याने पिकांना चांगला आधार व अन्नद्रव्ये मिळतात ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकतात.

वाफसा करण्याची योग्य वेळ

पेरणी केल्यानंतर, माती थोडी ओलावा आणि हवेशीर असावी लागते, ज्यामुळे बियाणे लवकर उगवू शकतात.

वाफसा कसा करावा:

पाणी व्यवस्थापन: जमिनीला जास्त पाणी देऊ नये, पण पुरेसा ओलावा हवा.

हवा खेळती ठेवणे: जमिनीतील हवा खेळती ठेवण्यासाठी खुरपणी किंवा इतर पद्धती वापरा.

खते: खते देण्यासाठी वाफसा योग्य असतो, कारण खते जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळतात.

वाफसा करण्याचे फायदे:

*पिके अधिक चांगल्या प्रकारे वाढतात.

*खते जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळून पिकांना चांगला फायदा देतात.

 *जमिनीची सुधारणा होते, ज्यामुळे ती अधिक चांगली होते.

वाफा पद्धत (SRT)

हि एक पारंपरिक पद्धत आहे. यात नांगरणी करून वाफे तयार केले जातात.

यामध्ये शेताच्या लांबीप्रमाणे लांबी घेवून १ ते १.२५ मीटर रुंदीचा वाफा तयार करायचं. हळवे पीक असेल तर २५ सेमी आणि गरवे पीक असेल तर (३० सेमी) १ फूट उंचीचा वाफा घ्यायचा.

सरळ ओळीमध्ये वाफे तयार होऊन जमिनीला चांगला वाफसा येवून साधारणत: जमीन भिजल्यानंतर जवजवळ २० ते २५ होलांचा साचा तयार होतो. तो साचा मारल्या नंतर दोन्ही बाजूला दोन माणसे ठेवून ३ ते ४ “बी” टाकतात.

काहीजण मल्चिंग करतात, त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो, या पद्धतीने भातशेतीचे खर्च आवाक्यात असून मिळणारे उत्पन्न चांगले असल्याचे कृषी अधिकारी संजय घरत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषि आयुक्त कार्यालयातून शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि, अवकाळी पाऊस सुरु असुन तो नियमित नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करु नये. अन्यथा पेरणी वाया जावून दुबार पेरणी करावी लागेल. वातावरण पोषक नसल्यानं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल..- संजय घरत, कृषी अधिकारी, वाडा तालुका कृषी कार्यालय